सोहनलालला गावाबाहेर हाकलणार?

सोहनलालला गावाबाहेर हाकलणार?

अरुणा शानबाग या परिचारिकेवर क्रूरपणे अत्याचार करणाऱ्या, तिला आयुष्यभरासाठी कोमात ढकलणाऱ्या, जिवंतपणी मरणयातना देणाऱ्या सोहनलाल वाल्मिकीला गावाबाहेर हाकलण्याच्या जोरदार हालचाली उत्तर प्रदेशातील पारपा गावात सुरू झाल्या आहेत. सोहनलालची काळी बाजू, तरुणपणी त्यानं केलेलं पाप मीडियाच्या माध्यमातून ग्रामस्थांना कळल्यानंतर, असला माणूस आपल्या गावात नको, अशी जोरदार मागणी त्यांनी पंचायतीकडे केली आहे.

वॉर्डबॉयने केलेल्या पाशवी हल्ल्यामुळे शारीरिकच नव्हे तर जबर मानसिक आघात होऊन तब्बल ४२ वर्षे अचेतन अवस्थेत रुग्णशय्येवर पडून असलेल्या केईएम हॉस्पिटलच्या नर्स अरुणा शानबाग (वय ६७) यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांनी कोमातच जगाचा घेतलेला निरोप सगळ्यांनाच चटका लावून गेला. त्यांच्या जाण्याने इच्छामरण – दयामरण हे विषय जसे पुन्हा उपस्थित झाले, तसेच अरुणाचं आयुष्यच उद्ध्वस्त करणारा सोहनलाल वाल्मिकी आहे कुठे, करतोय काय, जिवंत आहे की गेला, हे प्रश्नही सगळ्यांच्याच मनात उभे राहिले. ही उत्सुकता लक्षात घेऊन, एका मराठी वृत्तपत्रानं उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यातील पारपा या छोट्याशा गावात हलाखीत राहणाऱ्या सोहनलालला शोधून काढलं. स्वाभाविकच, त्याचा पत्ता देशभरात कळला. त्यामुळे अनेक वृत्तपत्रांमध्ये ही बातमी झळकली, वृत्तवाहिन्यांचे कॅमेरेही पारपामध्ये पोहोचले. या सगळ्या प्रकाराने आधी गावकरी चक्रावले, नंतर भीषण वस्तुस्थिती लक्षात आल्यानं ते हादरले आणि आता त्यांनी सोहनलालविरोधात मोहीमच उघडली आहे.

गेली अनेक वर्षं सोहनलाल आपल्या कुटुंबासोबत पारपा गावात राहत असला, तरी त्याच्याबद्दल फारशी कुणाला माहिती नव्हती. त्यानं एका तरुणीवर अत्याचार केलेत आणि त्यासाठी तुरुंगवास भोगलाय, ही पार्श्वभूमी तर अगदीच मोजक्या लोकांना ठाऊक होती. आता मात्र त्याचं हे कुकर्म संपूर्ण गावाला कळलंय आणि सोहनलालला गावाबाहेर काढण्यासाठी गावकरी पंचायतीवर दबाव आणत आहेत.

सोहनलालला मी अनेक वर्षं ओळखतो, पण तो खालच्या जातीचा असल्यानं त्याच्याशी कधी बोललो नव्हतो. प्रसारमाध्यमांमुळे आम्हाला त्यानं केलेला गुन्हा कळला आहे. त्याच्यामुळे गावाचं नाव खराब झाल्याची तीव्र भावना गावकऱ्यांमध्ये आहे. म्हणूनच वाल्मिकी कुटुंबालाच गावातून हाकलण्याची मागणी ते करत आहेत, अशी माहिती सरपंच जोगिंदर सिंह यांनी दिली. आता लवकरच पंचायतीची बैठक होऊन सोहनलालबाबत फैसला केला जाणार आहे.

दरम्यान, आपल्या डोक्यावरच छप्पर जाणार, या कल्पनेनं वाल्मिकी कुटुंबीय हादरलेत. अरुणा शानबाग प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोहनलालला अकारण गोवल्याचा कांगावा त्यांनी सुरू केलाय. परंतु, तो कुणालाच पटणारा नाही. त्यामुळे आता वाल्मिकी कुटुंबाचं भवितव्य अधांतरी आहे. पारपा गावातून हाकलल्यास त्यांना कोण आश्रय देणार, याबाबतही शंकाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *