मान्सूनचा नवा मुहूर्त आता ५ जूनला

मान्सूनचा नवा मुहूर्त आता ५ जूनला

वेगाने श्रीलंकेपर्यंत धडकलेल्या मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे भारतात मान्सून धडकण्याचा ३० मेचा मुहूर्त टळला असून, आता मान्सूनचे केरळमध्ये आगमन ५ जूनला होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मान्सून मंदावल्याने मुंबईकरांनाही पावसासाठी किमान १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

यंदाचा मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकेल, असे भाकीत भारतीय हवामानखात्याने वर्तवले होते. नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा वेग पाहता तो वेळेवर श्रीलंकेलाही पोहोचला परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मान्सून श्रीलंकेतच तळ ठोकून आहे. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल होत असून, केरळच्या किनाऱ्यावर त्याचे आगमन होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मुंबई आणि परिसरात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पंजाब, हरयाणात विजांसह पाऊस

चंदीगड : गेल्या काही दिवसांपासून उष्माने हैराण झालेल्या पंजाब, हरयाणाच्या काही भागांत रविवारी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे तापमान कमी झाल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आणखी काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हिमाचलमध्येही हजेरी

सिमला : हिमाचल प्रदेशमधील अनेक भागांमध्ये गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. राजधानी सिमल्यातही रविवारी पावसाने हजेरी लावली. सिमल्यामध्ये दिवसभर पावसाळी हवा होती. अनेक ठिकाणी दृश्यमानतही कमी होते. येत्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *