सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला १५ दिवसांत आदिवासी प्रवर्गातील आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. मात्र, आता भाजपने धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून घुमजाव केले आहे. ‘आरक्षणाबाबत खोटे आश्वासन देऊन भाजपने या समाजाची फसवणूक केली आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चर्चगेट येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुळे यांनी अभिवादन केले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण देऊ, हा आमचा शब्द आहे’, असा निवडणुकीपूर्वी भाजपने केलेला दावा त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी खोटा ठरविला आहे. ‘धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने त्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही’, असे स्पष्ट करणारे पत्र आदिवासी विकास मंत्री ओराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविले आहे, असे खा. सुळे यावेळी म्हणाल्या. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण द्यावे, यासाठी शरद पवार यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. त्या पत्रास उत्तर देताना ओराम यांनी वरील बाब स्पष्टपणे नमूद केली आहे.
‘धनगर समाजाची मते घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपला धनगर आरक्षणाच्या मागणीचा विसर पडला. या सरकारने धनगर समाजाची क्रूर चेष्टा केली आहे’, असा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.