जून महिन्यापर्यंत चालणारा कोकणच्या हापूस आंब्याचा सिझन यंदा मे महिन्यातच संपला. मात्र तरीही निराश होण्याची गरज नाही… कारण कोकणच्या आंब्याची जागा आता गुजरातच्या हापूस आंब्याने घेतली आहे. नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये गुजरातचा आंबा दाखल झाला आहे.
सध्या गुजरातहून एपीएमसी मार्केटमध्ये 40 ते 50 हजार पेट्यांची आवक होते आबे. विशेष म्हणजे हा आंबा 50 ते 80 रुपये किलोप्रमाणं विकला जातो.
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये महाराष्ट्रासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपल्याने हापूस आंब्याला त्याचा फटका बसला. आंब्याचा मोहर गळून पडला. वादळवारा आणि पावसामुळे आलेला मोहर गळाल्याने कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ५० ते ६० टक्के पीक हाताला लागले आहे. त्यामुळे जूनच्या मध्यावधीपर्यंत चालणारा कोकणातील हापूस आंब्याचा सिझन मे महिन्यातच आटोपला आहे.
कोकणातील हापूस आंबा संपला असला तरी गुजरातचा हापूस आंब्याने मार्केटमध्ये इंन्ट्री घेतल्याने खवय्यांना अजून महिनाभर आंब्याची चव चाखता येणार आहे. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये गुजरातवरून ४० ते ५० हजार पेट्यांची आवक होत आहे. यामध्ये हापूस , केसर आणि राजापूरी आंब्याचा समावेश आहे. गुजरातचा हापूस ५० ते ८० रूपये, केसर ४० ते ५० आणि राजापूरी २० ते २५ रूपये किलोने विकला जात आहे.