पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असले तरी मुंबईकरांना पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नैऋत्य मान्सून वा-यांची पुढील वाटचाल सुरू झाली आहे; मात्र अद्याप या वा-यांची केरळच्या खालच्या पट्टय़ातच नोंद झाली असल्याचे प्रादेशिक हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
महिनाअखेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होईल आणि १० जूनपर्यंत मुंबईत येईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता, मात्र अद्याप पाऊस केरळमध्ये दाखल न झाल्याने वरुणराजाचे आगमन लांबण्याची शक्यता आहे.
मुंबईकर चातकाप्रमाणे वरुणराजा बरसण्याची वाट बघत आहे. पावसाच्या सरी बरसेपर्यंत चाकरमान्यांना घामटा काढणा-या उकाडय़ाचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी राज्यातील काही भागांत मेघगर्जना, विजा कडाडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात विश्रांती घेतलेल्या नैऋत्य मान्सून वा-यांनी अरबी समुद्रात प्रवेश केला आहे. शुक्रवारी कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. तर शनिवारी वेंगुर्ला, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असून; ढगांचा गडगडात होण्याची शक्यता आहे. तर नांदेड, नाशिक, परभणी, नागपूर, मालेगाव, जळगावमध्ये मात्र उष्णतेची लाट कायम असेल.
राज्यात ठिकठिकाणी संमिश्र वातावरण असताना मुंबईतही ढग आणि सूर्याची लपवाछपवी सुरू आहे. सकाळी किंचित ढगाळ वातावरण, गार वा-यांमुळे मुंबईकर सुखावत असताना दुपारनंतर मात्र कडाक्याच्या उकाडय़ाला सामोरे जावे लागत आहे.
शुक्रवारी मुंबईत कुलाबा येथे कमाल ३४.६ अंश सेल्सिअस, किमान २९.८ अंश सेल्सिअस आणि ७७ टक्के आद्र्रतेची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे कमाल ३४.७ अंश सेल्सिअस, किमान २७.८ अंश सेल्सिअस आणि ६७ टक्के आद्र्रतेची नोंद झाली. ३५ अंशांपर्यंत स्थिर असलेले कमाल तापमान गेले तीन दिवस मात्र ३४ अंशांपर्यंत स्थिर आहे.