मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करीत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर भ्याड हल्ला करून मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईमधील अनेक ठिकाणांची सुरक्षा वाढवून ‘मुंबई’ला कडक बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आज आठ वर्षानंतर मुंबईच्या सुरक्षेत अभाव आहे, की चोख बंदोबस्त याचा आढावा घेतला असता, मुंबईची सुरक्षा अजूनही वा-यावरच असल्याचे दिसून आहे. सीएसटी, नरिमन हाऊस, गेट-वे, कामा रुग्णालय आदी ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले करत मुंबईला वेठीस धरले होतो. मात्र आठ वर्षाच्या भ्याड हल्ल्यानंतर येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होतेच; पण त्याबरोबर मुंबईतील अन्य ठिकाणीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहावयास मिळते.
सीएसटी स्थानक
सीएसटी स्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त हा आणखी कडक करण्यात आला पाहिजे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
लियोपोल्ड कॅफे
लियोपोल्ड कॅफेलाही २००८ मध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. त्यावेळी अनेक पर्यटक या कॅफेमध्ये उपस्थित होते. आज कॅफेमधील परिस्थिती पाहिली तर पर्यटक आजही या कॅफेमध्ये येतात. त्यामुळे २६/११च्या हल्ल्यानंतरही कॅफेमध्ये येणा-या ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. लियोपोल्ड कॅफेच्या सुरक्षेबाबत विचारले असता, ग्राहकांच्या सुरक्षेचा पूर्णपणे विचार केला आहे. अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
नरिमन हाऊस
बरोबर ७ वर्षापूर्वी म्हणजेच २६/११ला मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात शेकडो निष्पाप जणांचा बळी गेला होता. तसेच भारतीय सुरक्षा रक्षकांनी पाकिस्तानातून आलेल्या ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर जिवंत पकडलेल्या अजमल कसाबला फाशी देण्यात आली. समुद्रमार्गे बधवार पार्क येथून आलेल्या दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसमध्ये हल्ला केला होता, त्यात रहिवाशांसह विदेशी नागरिक जखमी झाले होते. २६/११च्या पार्श्वभूमीवर आज मुंबईसह देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच २६ नोव्हेंबरला मुंबईत शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रमही करण्यात येतो.
२६/११च्या आठवणी अजूनही ताज्याच
माझे दुकान या नरिमन हाऊसला लागूनच आहे. नरिमन हाऊसवर ज्यावेळी हल्ला झाला होता तेव्हा निष्पाप बळी गेलेल्यांचे देह मी पाहिले होते, तसेच आताच पॅरिसवर झालेल्या हल्ल्याची बातमी ताजी आहे. आजही तो दिवस आठवला तर अंगावर काटा येतो. नरिमान हाऊसमध्ये सुमारे ४८ तास सुरू असलेल्या लढाईत संपूर्ण इमारत खिळखिळी झाली होती. आता सगळं नीट झालं असलं तरी थोडीफार तर भीती आहेच, मनात येतं कधी काय होईल सांगता येत नाही, येथे पण पोलिसांचा पहारा नेहमी असतो, त्यामुळे भीती अशी वाटत नाही. – फुलचंद केसरवाला, दुकानदार
स्थानकांवर पोलीस सुरक्षा पाहिजे
हल्लेखोर नेहमी गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करतात आणि त्यामुळे लोकल ट्रेन व गर्दी असलेली स्थानके ही जास्त सुरक्षित असली पाहिजे. लोकल ट्रेनच्या डब्यातही पोलीस तैनात केले पाहिजे. नुसतेच सीएसटी स्थानक नाही तर प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे. – मुकेश गुप्ता, प्रवासी
पुढच्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मात्र आपल्या राजकीय नेत्यांना अशा ठेचा वारंवार लागून त्यातून ते काहीही बोध घेत नाहीत. याची अनेक उदाहरणं देता येतील. मात्र आजचा विषय थोडा वेगळा आहे. २६/११ निमित्त पुन्हा एकदा मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईची सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, असा दावा मुंबई पोलीस व संबंधित सुरक्षा यंत्रणा करत असल्या तरी मुंबई अजूनही असुरक्षित आहे. आपली सुरक्षायंत्रणा किती सक्षम आहे, हे सांगतानाच सर्वकाही आलबेलच आहे. त्यामुळे २६/११ ची घटना भविष्यात पुन्हा घडली, तर त्याला पोलीस, सरकार, राजकीय नेते आणि मुंबईकर जबाबदार असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
२६/११ हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी समुद्रमाग्रे मुंबईत प्रवेश करत मुंबईला ६० तास वेठीस धरले होते. अतिरेकी समुद्रमार्गाचा पुन्हा वापर करणार नाहीत, असे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे सागरी सुरक्षेला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे. उपनगरीय लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे पोलीस कमी संख्येत आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मॉल, सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स आदी ठिकाणी मुंबई पोलिसांकडून वारंवार सुरक्षेची पाहणी केली जाते. मात्र या ठिकाणांची सुरक्षा किती कुचकामी आहे, हे अनेकदा पोलिसांनीच दाखवून दिले आहे. २६/११सारखा अतिरेकी हल्ला झाला तर संबंधित यंत्रणा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे का, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. सात वर्षानंतर आजची परिस्थिती पाहता मुंबई शहर सुरक्षित आहे का, तर नक्कीच नाही. २६/११च्या आत्मघाती हल्ल्यावेळी सीएसटी रेल्वे स्थानक, ताज, ओबेरॉय हॉटेल, लिओपोड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि सेंट झेव्हिअर कॉलेज आदी ठिकाणांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते.
बॉम्बस्फोटासारख्या घटना घडल्या की हळहळ व्यक्त करायची, आपण त्यातून सहीसलामत बचावलो म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्यायचे. मात्र आपले आजचे मरण उद्यावर गेले आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण यापुढे बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले होणार नाहीत याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे मुंबई अजूनही असुरक्षित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मुंबई सुरक्षित कधी होणार, असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे.