दुस-या दिवशी २० गडी बाद

दुस-या दिवशी २० गडी बाद

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेला कसोटी सामना तिस-याच दिवशी निकाली निघण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७८ धावांची आवश्यकता असून त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत.

फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दुस-या दिवशी एकूण वीस गडी बाद झाले. फिरकी त्रिकुटाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७९ धावात गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीरनेही खेळपट्टीचा अचूक लाभ उठवत भारताला दुस-या डावात अवघ्या १७३ धावांवर रोखले.

पहिल्या डावातील १३६ धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयसाठी ३१० धावांचे आव्हान दिले. दुस-या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद ३२ धावा झाल्या आहेत. वॅन झील (५) आणि नाईट वॉचमन इम्रान ताहीर (८) तंबूत परतले आहेत.

कसोटीचे अजून तीन दिवस शिल्लक आहेत. विजयासाठीचे दक्षिणआफ्रिकेसमोरील लक्ष्य फार मोठे दिसत नसले तरी, फिरकी गोलंदाजी खेळताना पाहुण्यांची उडणारी धांदल पाहता भारताचे पारडे जड वाटत आहे. दुस-या डावात भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक (३९) धावा केल्या. इम्रान ताहीरने पाच गडी बाद करुन भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

दुस-या डावात मुरली विजय (५), शिखर धवन (३९), चेतेश्वर पूजारा (३१), विराट कोहली (१६) आणि अजिंक्य रहाणे (९) स्वस्तात माघारी परतले.

तत्पूर्वी सकाळच्या सत्रात भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त ७९ धावात संपुष्टात आला.  फक्त जे.पी.डयुमिनी (३५) थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक पाच त्याखालोखाल रविंद्र जाडेजाने चार आणि अमित मिश्राने एक गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *