देशामध्ये असुरक्षिततेचं वातावरण असून पत्नी किरणला आमच्या मुलांची प्रचंड काळजी वाटत असून तिने पहिल्यांदाच देश सोडून जाण्याचंही माझ्याकडून बोलून दाखवलं.’ असं वक्तव्य अभिनेता आमीर खान यानं गौप्यस्फोट केला आहे. तो रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात बोलत होता.
देशातील असहिष्णुतेच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसिचं या अभिनेत्यानं समर्थन केलं आहे. दहशतवादाला एका विशिष्ट धर्माचा टॅग लावणं चुकीचं आहे. मी सर्व धर्मियांचं प्रतिनिधित्व करतो मात्र, मला मुस्लिमांचा प्रतिनिधी का म्हटलं जातं असा सवालही त्यानं उपस्थित केला आहे.
दादरी हत्याकांडानंतर देशभरात या घटनेविरोधात मोठे पडसाद उमटले. या हत्याकांडाच्या निषेधार्थ अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. देशाच्या विविध स्तरांतून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहरुख खाननेही देशात असहिष्णुता वाढत असल्याचे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून त्याच्यावर चौफर टीकाही करण्यात आली होती.
तर आता मि. परफेक्टनिस्टनेही देशात असुरक्षिततेचं वातावरण असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता आमीरच्या या वक्तव्यावर भाजप कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.