मध्य रेल्वेच्या ‘तांत्रिक’ पेचात वाढ

मध्य रेल्वेच्या ‘तांत्रिक’ पेचात वाढ

सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि लोकलमधील बिघाड होण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वे सध्या ‘तांत्रिक’ पेचात अडकली आहे. सात महिन्यांत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तब्बल १ हजार ७४९ घटना तांत्रिक बिघाडाच्या घडल्या असून, यात सिग्नल बिघाडाच्या घटनांनी एक हजाराचा पल्लाही पार केला आहे, तर लोकलमध्ये बिघाड होण्याच्याही घटना ४८0 घटना रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळी किंवा संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेसेवा कोलमडते आणि प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १८ नोव्हेंबर रोजी टिटवाळ्याजवळ सकाळच्या सुमारास रुळाला तडा आणि संध्याकाळी माटुंगा स्थानकाजवळ चारही मार्गांवर सिग्नल यंत्रणेतील बिघाड होण्याच्या घटनांमुळे दिवसभरात १६२ लोकल गाड्यांना लेटमार्क लागला, तर १३ लोकल रद्द करण्यात आल्या. यात सिग्नल बिघडण्यामुळे तर जवळपास १२५ लोकल रद्द करण्यात आल्याचे समोर आले. या दोन्ही घटनांमुळे सकाळपासून सुरू झालेली तांत्रिक समस्या प्रवाशांना रात्री घरी जाईपर्यंत सोसावी लागली. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली. अशा तांत्रिक बिघाडाच्या अनेक घटना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घडत असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा मात्र निघू शकलेला नाही. गेल्या सात महिन्यांत (एप्रिल २0१५ ते आॅक्टोबर २0१५) तर एकूण १ हजार ७४९ तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. यात सर्वाधिक सिग्नल बिघडण्याच्या तब्बल १,00२ घटना घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *