पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. देशात चांगले दिवस येण्यासाठी आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे, असे स्पष्ट करतानाच बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षात चैतन्य आले आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आज येथे केले.
गुजरातमधील महापालिका निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी अडवानी अहमदाबादला आले आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की 2014 मध्ये देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत चांगले दिवस आणण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. देशात खरच चांगले दिवस येथील; मात्र त्यासाठी आणखी काळी काळ जावा लागणार आहे. “अच्छे दिन‘ आणि डाळीचे आकाशाला भिडलेले भाव याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की जर दिशा योग्य असेल तर निकालही चांगले असतील. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे काम मी पाहिले आहे. त्यांच्या कामाचा आवाका मला माहीत आहे. केंद्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्याचेही मी समर्थन करतो.