बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भलेही सरकार स्थापन झाले असले, तरी या नव्या सरकारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्याच शब्दाला वजन असणार आहे. तेजस्वी यादवला उपमुख्यमंत्री करून लालूंनी षट्कार खेचल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. दरम्यान, लालूंच्या दोन्ही मुलांना मंत्री करण्यास नितीशकुमार यांचा विरोध होता. यामुळे महाआघाडीबाबत जनतेत योग्य संदेश जाणार नाही असे त्यांचे म्हणणे होते; पण लालू तेजस्वीबाबत अधिक भावूक झाले होते. केवळ त्यांच्या आग्रहामुळे तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. याआधी भाजपसोबत सत्तेत असताना नितीश यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार मोदी हे काम पाहत असत. सुशील मोदी यांना कामाचा मोठा अनुभव आहे. बिहार आंदोलनामध्ये त्यांनी लालू आणि नितीश यांच्यासोबत काम केले होते. अनेक वेळेस आमदार आणि खासदार झाल्यानंतर 2005 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती, त्या तुलनेमध्ये तेजस्वी यादव नवखे आहेत.
अनेक आमदारांमध्ये नाराजी
संयुक्त जनता दलामधील अनेक नेत्यांना मंत्रिपदाची आशा होती; पण ऐनवेळी त्यांना डावलण्यात आल्याने आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. नितीशकुमार यांचे निकटवर्तीय असलेले शाम रजक यांना मंत्री करण्यात आलेले नाही. रजक आजच्या शपथविधी समारंभास देखील अनुपस्थित होते. भाई वीरेंद्र यांनीही या समारंभामध्ये सहभागी होणे टाळले, ते नाराज असल्याचे सांगितले जाते.
महत्त्वाचे खातेवाटप
तेजस्वी यादव : उपमुख्यमंत्री, रस्तेनिर्मिती, सामान्य प्रशासन, माहिती आणि प्रसारण,
तेजप्रताप यादव : आरोग्य, सूक्ष्म सिंचन आणि पर्यावरण,
अब्दुल बारी सिद्दीकी : अर्थ मंत्रालय,
विजेंद्रप्रसाद यादव : ऊर्जा,
लल्लन सिंह : जलसंधारण,
मंजू वर्मा : समाजकल्याण,
मदन मोहन झा : महसूल आणि जमीन सुधारणा,
मदन साहनी : अन्नपुरवठा मंत्रालय आणि
अशोक चौधरी : शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान