‘लोकमंगल’च्या व्यवस्थापनाची मुंबईच्या डबेवाल्यांनाही भुरळ

‘लोकमंगल’च्या व्यवस्थापनाची मुंबईच्या डबेवाल्यांनाही भुरळ

आदर्श व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना ठरलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठीही व्यवस्थापनाकरिता कुतूहलाचा विषय झाला, असा सोलापूरच्या लोकमंगल फाऊंडेशन आयोजित सामूदायिक विवाह सोहळा येत्या रविवारी,२२ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. या विवाह सोहळ्यात एकाचवेळी १५१ जोडपे विवाहबध्द होणार आहेत.

२००६ पासून लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजिला जातो. आतापर्यंत २१ सामूहिक विवाह सोहळे झाले असून यात २०२१ जोडपे विवाहबध्द झाले आहेत. यंदाच्या २२ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची हरिभाई देवकरण प्रशालेच्या मदानावर जय्यत तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. याबाबतची माहिती ‘लोकममंगल’चे संस्थापक तथा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पावणेचार लाख चौरस फुटाचा भव्य मांडव उभारण्यात आला आहे. यानिमित्ताने एक लाख वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले जाणार आहे. रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न होण्यापूर्वी सर्व नवजोडप्यांची ऑटोरिक्षांतून सवाद्य वरात काढली जाणार आहे. विवाहानंतर वधु-वरांनी आयुष्यात कसे वागावे, सासू-सासरे-दीर-नणंदांना आपलेसे कसे करावे, तसेच आरोग्य कसे सांभाळावे, यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुधा कांकरिया (नगर), आमदार प्रा. संगीता ठोंबरे (बीड), डॉ. विठ्ठलराव लहाने (लातूर), गणेश िशदे (यशदा, पुणे), ज्येष्ठ पत्रकार अरिवद जोशी हे समुपदेशन करणार आहेत. विवाह सोहळ्यात वधु-वरांकडील मंडळी व पाहुण्यांच्या सहभागातून रक्तदान शिबिराचेही आयोजन केल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. वधू-वरांना पोशाखासह संसारोपयोगी साहित्य वितरित करण्यात येणार असून सर्व १५१ वधूंची वेशभूषा व रंगभूषा करण्यासाठी ६० महिला तज्ज्ञांचे पथक कार्यरत राहील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यंदाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भेटीवर आधारित ‘शक्ती व भक्ती’ हा भव्य सजावटीचा देखावा सादर केला जाणार आहे. वधु-वरांना जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावाने दोन हजारांची ‘शुभमंगल ठेव’ लोकमंगल फाऊंडेशनमार्फत राबविली जाते. आतापर्यंत लोकमंगलच्या उपक्रमात सहभागी होऊन विवाहबध्द झालेल्या सर्व जोडप्यांच्या आíथक उत्थानासाठी स्वतंत्र पतसंस्था स्थापन करण्याचा मनोदयही आमदार देशमुख यांनी बोलून दाखविला. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या व्यवस्थापनाची राज्यात वाखाणना झाली असून यात मुंबईचे डबेवालेही आकर्षति झाले आहेत. हे व्यवस्थापन पाहून इतर ठिकाणीही सामूहिक विवाह सोहळे आयोजिले जातात, असा दावाही करण्यात आला. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे संचालक शहाजी पवार, अविनाश महागावकर, अण्णासाहेब कोतली, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *