कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळय़ांत पाणी आणले असताना टोमॅटोची चवही बिघडू लागली आहे. दिल्लीत टोमॅटो किलोमागे ६२ रुपये भाव खात असून ५० टक्क्यांनी महागला आहे. बाजारात नवीन पीक आल्यावर टोमॅटोचे भाव आवाक्यात येतील, असे सरकारकडून सांगितले जात आहे.
मुंबईतही टोमॅटोसाठी किलोमागे ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. देशातील इतर राज्यांतही टोमॅटोचे भाव कडाडल्याचे अन्न आणि ग्राहक व्यवहार खात्याने म्हटले आहे. या संदर्भात बुधवारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि भाव यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. अवघ्या महिनाभरात टोमॅटोने ४१वरून किलोमागे ६२ रुपये भाव गाठला आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचा सरासरी भाव ३० वरून किलोमागे ५० रुपये झाला आहे.
मागील आठवडाभरापासून दक्षिणेकडील राज्यांत पडणा-या पावसामुळे टोमॅटोच्या पिकाला फटका बसून आवक घटली आहे. ही भाववाढ तात्पुरती असून लवकरच भाव आवाक्यात येतील. लवकरच टोमॅटोचे नवे पीक बाजारात येईल, असे एका अधिका-याने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. या वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित काम करत आहे.