मागील आठवडाभरापासून तामिळनाडूत मुक्काम असलेल्या पावसाचा फटका बसून आत्तापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळी वा-यासह मुसळधार पावसाची इनिंग सोमवारीही सुरूच राहिल्याने विविध जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सक्तीची सुट्टी देण्यात आली होती.
मंगळवारी सायंकाळपर्यंत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तामिळनाडूनंतर आंध्र प्रदेश व कर्नाटककडे पावसाने आपला मोर्चा वळवल्याने हाहाकार उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. तामिळनाडूत आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे आत्तापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे.
नोव्हेंबर ११ ते १५ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात बुडून व भिंत पडून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सोमवारी तातडीने कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री जयललिता यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.
आणखी तीन दिवस पावसाचे
तामिळनाडूत येत्या तीन दिवसांत पावसाचा आणखी जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुड्डचेरी व आंध्र किनारपट्टी परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सतत पडणा-या पावसामुळे तामिळनाडूतील जनव्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सक्तीची सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यातील काही महत्त्वाच्या मार्गावर पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर तुंबल्याने येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. येत्या २४ तासांत तामिळनाडूच्या किनारपट्टी क्षेत्रात हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर तामिळनाडू आणि पुड्डचेरी पट्टय़ात रविवारी सकाळी ८.३० पासून पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे पोनेरेतील तिरुवल्लूर येथे ३७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, संततधार पावसामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून येथील धरणे, तलाव भरून वाहत आहेत. दरम्यान, पुड्डचेरी येथे १६, १७ आणि १८ तारखेला होणा-या मेडिकल, इंजिनीयरिंग आणि एमसीएची परीक्षा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.