लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ज्या गिरगाववर प्रेम होते, त्या गिरगावचे नामोनिशाण मिटवण्याचे काम राज्यातील भाजपाप्रणित सरकार करत आहे.
गिरगाव चौपाटीचे नामकरण स्वराज्यभूमी असे करण्यास नगरविकास खात्याने मंजुरी दिली असून हा फलक लावण्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे.
मात्र, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले गिरगावचे नाव पुसले जात असल्यामुळे याला शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी हरकत घेऊन ‘स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी’असे नामकरण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे स्वराज्यभूमीच्या नावावरून शिवसेना-भाजपात पुन्हा एकदा खडाजंगी उडण्याची शक्यता आहे.
गिरगाव चौपाटी ही ऐतिहासिक वास्तू क्षेत्रात मोडत असून अनेक ऐतिहासिक घटनांची ती साक्षीदार आहे. मुंबईत येणारा पर्यटक हा गिरगाव चौपाटीवर येऊन फेरफटका मारल्याशिवाय जात नाही. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांची भाषणे गिरगाव चौपाटीवर झाली आहेत.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्याही सभा याठिकाणी गाजल्या. एवढेच नव्हे तर शिवसेना-भाजपा युतीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ याच चौपाटीवर फोडला गेला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणेही याच ठिकाणी गाजली आहेत. या गिरगाव चौपाटीचे नाव आता इतिहासजमा करण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे.
या गिरगाव चौपाटीला ‘स्वराज्यभूमी’ असे नाव देण्याची मागणी स्वराज्यभूमी प्रतिष्ठान संचालित लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑगस्ट २०११मध्ये ठराव करण्यात आला होता.
त्यानंतर नगरविकास खात्याकडे या समितीने पत्रव्यवहार केला होता. त्याप्रमाणे नगरविकास खात्याने १७ मार्च २०१५ रोजी गिरगाव चौपाटीस स्वराज्यभूमी असे नाव देण्याचा अध्यादेश जारी केला आहे.
या अध्यादेशानंतर समितीने गिरगाव चौपाटीवर चार नामफलक लावण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू केला. यामध्ये त्यांनी भेळ प्लाझाजवळ टिळक गार्डन, मुख्य प्रवेशद्वार आणि वाळकेश्वरच्या बाजूस अशाप्रकारे हिंदी, मराठी आणि इंग्रजीतून फलक लावण्याचे निश्चित केले.
मात्र, ही बाब शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्रव्यवहार करून शासन निर्णयात बदल करून गिरगाव चौपाटीस ‘स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी’ असे नामकरण करण्याची मागणी केली आहे. स्मारक समितीच्या वतीने २००७पासून असे नामकरण करण्याचा प्रयत्न चालू असून फडणवीस सरकारने मार्चमध्येच या फाईलचा निपटारा करत गिरगाव चौपाटीचे नाव बदलून स्वराज्यभूमी असे करण्यास संमती दिली. अशाप्रकारचा निर्णय घेत शिवसेनेसमोर अडचण निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे.
गिरगाववर लोकमान्य टिळकांचे प्रचंड प्रेम होते. पहिला सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी गिरगावमधून सुरू केला. तर त्यांचे देहांत झाल्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार गिरगाव चौपाटीवर झाले आहे.
त्यामुळे गिरगाव चौपाटीची ओळख ही जगभरात आहे. गणेशोत्सवात सर्वाधिक गणेशमूर्ती विसर्जन हे गिरगाव चौपाटीवर होते. त्यामुळे गिरगाव चौपाटीचे नामकरण ‘स्वराज्यभूमी’ असे करण्यात आल्यामुळे गिरगावमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करत बागलकर यांनी स्वराज्यभूमी व गिरगाव चौपाटी अशा दोन्ही नावांचा समावेश असेल,असा सुवर्णमध्य काढत ‘स्वराज्य भूमी गिरगाव चौपाटी’ असे नाव सुचवून त्याप्रमाणे अध्यादेशात बदल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत स्मारक समितीचे संस्थापक प्रकाश सिलम यांच्याशी चर्चा झालेली असून त्यांनीही या नावास संमती दर्शवली असल्याचे बागलकर यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यामध्ये बदल करतात की शिवसेनेला झुलवत ठेवतात याकडे सर्वाचे लक्ष आहे.