बोगस बी. एड. प्रमाणपत्र सादर करून नोकरीस लागलेल्या भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेचा मुख्याध्यापक अशोक मोतीराम अहिरे याने शासनाची मोठी फसवणूक केली आहे. त्याने बोगस पदवीच्या आधारे नोकरी मिळवली असून त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जात आहे.
एप्रिल १९९० साली सेवेत भरती होताना त्याने पुणे विद्यापीठाच्या बी. एड. गुणपत्रकात फेरफार करत स्वत:चे नाव टाकून हे गुणपत्रक अर्जासोबत जोडले होते. हे मूळ गुणपत्रक संजय जगन्नाथ खैरनार यांचे असल्याचे पुणे विद्यापीठातील माहितीची फेरतपासणी केल्यानंतर उघड झाले आहे.
शिवाय हे प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून अहिरेने १९९७ साली पुणे विद्यापीठातून कोणतीही रजा न घेता पूर्ण वेतन घेत बी. पी. एड. अभ्यासक्रम केला आहे. वास्तविक बी.पी.एड. हा प्रात्यक्षिक अभ्यासक्रम असतानाही एखादा विद्यार्थी रजा न घेता बी.पी.एड. कसा करू शकतो? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिवाय त्याने बी.पी.एड. जर १९९७ साली केले असेल, तर त्याची भरती नेमकी कुठल्या निकषांच्या आधारे झाली? याबाबत संबंधित आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयाने विभागाने लक्ष का दिले नाही? यात काही ‘हितसंबंध जपले गेले का? असे सवाल या प्रकारानंतर विचारले जात आहेत.
या फसव्या मुख्याध्यापकाने आत्तापर्यंत पुणे विद्यापीठ, आदिवासी विकास विभाग व सरकारची फसवणूक करत लाखो रुपये वेतनापोटी हडप केले असून शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारची बोगसगिरी करणा-या मुख्याध्यापक अहिरेंवर गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कोकण विभाग सुशिक्षित बेरोजगार पदवीधारक संघाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे येथील शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.