दिवाळीसाठी मोठय़ा प्रमाणावर माव्यापासून तयार मिठाईची खरेदी होत असली तरी ही मिठाई दोन दिवसांत संपवा, असे आवाहन राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) ने ग्राहकांना केले आहे.
अनेकदा बरेच दिवस मिठाई राहिल्याने तिला बुरशी लागते. ही खराब मिठाई आरोग्याचा अपायकारक ठरू शकते. त्यामुळे खवा-माव्यापासून तयार मिठाई ४८ तासांत फस्त करावी, असा सल्ला एफडीएने दिला आहे.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत मिठाईची वाढती मागणी लक्षात घेता अनेक दुकानदार पदार्थाचा दर्जा राखण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा मिठाई तयार करण्यासाठी भेसळही केली जात असल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
दिवाळीत कच्चे व तयार अन्न पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘एफडीए’ने भेसळखोरांवर करडी नजर ठेवली आहे. मुंबई आणि राज्यात कोणत्याही प्रकारची एफडीएने आपली यंत्रणा कामाला लावल्याचे ‘एफडीए’चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले.
‘एफडीए’तर्फे राबवण्यात येणा-या मोहिमेंतर्गत रवा, मैदा, तूप, वनस्पती तेल, गूळ व मावा या पदार्थाचे ९० हून अधिक नमुने जप्त करण्यात आले आहेत, असेही अन्नपुरे यांनी सांगितले.