रोजच्या जेवणातील अन्नपदार्थ दिवसेंदिवस महाग होत असून सर्वसामान्यांना आता दोन वेळचे जेवणही खाणे मुश्कील झाले आहे. तूरडाळींच्या भावांनी २०० रुपयांचा पल्ला गाठल्यानंतर आता तांदळाच्या किमतीही कडाडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे डाळ-भात कसा खायचा, असा प्रश्न लवकरच सर्वसामान्यांना पडणार आहे.
तूरडाळ, उडीद डाळीचे भाव १५० ते २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दोन वेळ वरण भुरकतानाही विचार करावा लागत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने खरिपातील तांदळाचे उत्पादन कमी होणार आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कारण भारतीयांचे रोजचे अन्न असलेला तांदूळ लवकरच आणखी महाग होण्याची चिन्हे आहेत.
‘असोचेम’ने दिलेल्या अहवालात सांगितले की, डाळी, कांदा, राईचे तेल आधीच महाग झाले आहे. याबाबत सरकारने योग्य उपाययोजना न केल्यास तांदळाच्या किमती भडकण्याची चिन्हे आहेत. कारण खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने तांदळाचे उत्पादन घटणार आहे. यंदा २०१५-१६च्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ९०.६१ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.
कारण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र व कर्नाटकात पाऊस कमी झाला. तसेच तांदळाचा साठा गेली तीन र्वष सातत्याने घटत चालला आहे. २०१२ मध्ये २४.५९ दशलक्ष टन असलेला तांदळाचा साठा १३.८९ दशलक्ष टनांपर्यंत घसरला आहे.
तसेच सरकारने निर्यात व समाजकल्याण योजनांसाठी तांदळाचा साठा ठेवण्यात येणार असल्याने बाजारात तांदळाच्या टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम बाजारातील किमतींवर होणार आहे, असे असोचेमच्या अहवालात नमूद केले आहे.