नेपाळमध्ये उद्भवलेल्या संकटाला भारताला जबाबदार धरत नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पुन्हा एकदा चीनची स्तुती केली आहे. चीनकडून नेपाळला चतेल व अन्य जीवनाश्यक वस्तूंची निर्यात करण्यात येत आहे.
नेपाळ-भारत सीमेवर भारत सरकारने अघोषित नाकाबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे भारतातून नेपाळमध्ये होणारी जीवनाश्यक वस्तूंची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. याचा फटका नेपाळला मोठ्या प्रमाणात बसत असून, नेपाळने चीनकडे मदतीचा हात पसरला आहे. चीनने आपल्या सीमा खुल्या करत नेपाळला मदत केली आहे. यामुळे भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत ओली यांनी चीनचे आभार मानले आहेत.
ओली म्हणाले, की सीमेवर भारताकडून करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे नेपाळमधील नागरिकांच्या मनात शेजारील देशाबद्दल नकारात्मक छबी निर्माण झाली आहे. भारताच्या नाकेबंदीमुळे जीवनाश्यक वस्तूंची आवक थांबली असून, त्याचा परिणाम थेट गर्भवती महिला, लहान मुले व अन्य नागरिकांवर झाला आहे. आरोग्य सुविधांची गरज असलेल्यांना याचा मोठा फटका बसला आहे. भूकंपापेक्षा भयानक स्थिती भारताच्या नाकाबंदीमुळे झाली आहे. दुसरीकडे चीनबरोबर आम्ही भविष्यात व्यापार आणखी वाढविणार आहोतच, याबरोबर त्याचा विस्तारही करणार आहोत.