दिल्ली पाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या मोठया पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत असंतोषाचे स्वर अधिक तीव्र होऊ लागले आहेत. बिहारमधल्या दारुण पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीला जबाबदार धरण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर बाजूला पडलेला लालकृष्ण अडवाणी गटही मोदी-शहांविरोधात सक्रीय झाला आहे. भाजपाचे बिहारमधील खासदार शत्रूघ्न सिन्हा, चंदन मित्रा आणि आर.के.सिंह यांनी बिहारच्या पराभवासाठी स्पष्टपणे भाजपा नेतृत्वावर टीका केली आहे.
चंदन मित्रा यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचाराच्या रणनितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. एका मोठया निवडणुकीत मतदारांनी भाजपावर नापसंतीची मोहोर उमटवली अशा शब्दार मित्रा यांनी या पराभवाच वर्णन केल.
भाजपा खासदार आर.के.सिंह यांनी बिहारमध्ये गुन्हेगारांना तिकीट देण्यावरुनही नाराजी व्यक्त केली होती. भाजपाचे दुसरे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनी सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टार्गेट केले होते. विजयाचे श्रेय जसे कर्णधाराचे असते तसेच पराभवाची जबाबदारीही त्याचीच असते असे शत्रूघ्न म्हणाले. येणा-या दिवसांमध्ये भाजपमधील अंतर्गत धुसफूस अधिक तीव्र होऊ शकते.