नांदेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. गरीबीला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केलीय. तर तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानंही आपला जीवनप्रवास संपवलाय.
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या या घरात शोककळा पसरलीय. कारण या घरातल्या दोन व्यक्तींनी मृत्यूला कवटाळलंय… मुमताज अत्तार… वृद्ध आई आणि आपल्या लेकासह याच घरात राहत होती. मुलगा पोटात असतानाच पती सोडून गेला. मात्र मुमताजनं मोठ्या हिंमतीनं धुणीभांडी किंवा मिळेल ते काम करुन मुलगा अस्लमला शिकवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र कामही मिळत नाही… महागाई वाढलेली अशात जगायचं कसा असा प्रश्नही तिला सतावत होता. याच विवंचनेत एका पूलावरुन उडी मारुन तिनं आपला जीवनप्रवास संपवला.
मुमताजचा लेक अस्लमला शिकण्याची जिद्द होती. खडतर परिस्थितीत तो शिकत होता. सैन्यात जाण्याच्या ध्येयानं संबंधित पुस्तकं वाचून अभ्यास करत होता. मात्र त्याचा एकलुता एक आधार असलेली आई त्याला सोडून गेली. त्यामुळं आईच्या विरहात अस्लमनंही गळफास लावून आत्महत्या केली. आईशिवाय जगात कोणीच नव्हतं असं त्यानं एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं.
गेल्या अनेक वर्ष कुणी गरीबी हटाव तर कुणी अच्छे दिनच्या घोषणा करतात.. किती सरकारं आली आणि गेली.. तरी गरीबी अनेक कुटुंबांसाठी अभिशाप असल्याचं या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय.