कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग ऐन दिवाळीत दिवाळखोरीत

कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग ऐन दिवाळीत दिवाळखोरीत

जागतिक मंदीमुळे काजूगराची मागणी कमी झालेली असतानाच काजू बियांचा दर सव्वाशे रुपयांच्या घरात पोचल्याने कोकणातील काजू प्रक्रिया उद्योजकांना ऐन दिवाळीत दिवाळखोरीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक लहान उद्योजकांनी कारखान्याचे ‘शटर डाऊन’ केले असून मोठय़ा उद्योजकांनी प्रक्रियेचे काम कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात सर्वत्र जागतिक मंदीचा फटका बसत असताना काजूगराची मागणी अतिशय कमी झाली आहे. साहजिकच गेल्या सहा महिन्यांत काजूगराच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. मात्र गेल्या हंगामात कोकणासह संपूर्ण देशात काजू बियांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटल्याने बियांचे दर अल्पावधीतच १०० रुपयांपर्यंत पोचले. आता तोच दर ११० ते १२५ च्या आसपास पोचला आहे. दर्जाबाबत श्रेष्ठ ठरणाऱ्या भारतीय काजू बियांचे दर वाढीव राहत असल्याने अनेक उद्योजक दरवर्षी परदेशी काजू बियांवर अवलंबून राहतात. या काजू बिया २५ टक्क्यांनी स्वस्त पडत असल्याने काजूगर उत्पादन मूल्यही कमी ठेवण्यात या उद्योजकांना यश येते. यंदा मात्र डॉलरने ६५ रुपयांचा टप्पा ओलांडल्याने आयात होणाऱ्या काजू बियांनाही यंदा १००-११० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे आता मोठय़ा प्रमाणात काजू बिया खरेदी करणे, उद्योजकांसाठी जिकिरीचे झाले आहे.
एका बाजूला काजू बियांची ही दरवाढ होत असताना काजूगराच्या किमती मात्र मागणीअभावी स्थिर राहिल्या आहेत. उत्पादनासाठी लागणारे मनुष्यबळ, वीज, वाहतूक आणि पॅकिंग या चार बाबींचा फक्त विचार करता काजूगराचा प्रतिकिलो खर्च सध्या ५३० ते ५५० रुपयांवर गेला आहे. पण घाऊक बाजारात मागणी कमी असल्याने प्रतिकिलो दर सरासरी ५७० ते ६०० रुपये निश्चित होत आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करून उभारलेले कारखाने अडचणीत आले आहेतच, पण छोटे उद्योजकांनीही कमी नफा मिळवण्याऐवजी कारखाना बंद ठेवणे पसंत केले आहे.
बिया खरेदीसाठी सरकारी पाठबळ गरजेचे
आंब्यापाठोपाठ कोकणातील अर्थव्यवस्था स्थिर करणाऱ्या काजू प्रक्रिया उद्योगांची दु:स्थिती झालेली असताना राज्य सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. काजू बिया मोठय़ा प्रमाणात बाजारात आलेल्या असताना म्हणजेच फेब्रुवारी ते मे दरम्यान उद्योजकांना बी खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज आंबा काजू महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यास कोकणातील छोटे, मोठे काजू प्रक्रिया उद्योजकांना नवसंजीवनी मिळेल. त्यामुळे जागतिक मंदीत डबघाईला आलेला हा उद्योग पुढील हंगामात नव्याने उभारी घेईल, अशी अपेक्षा रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयवंत विचारे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *