येत्या जानेवारीत पुण्यातील पिंपरी-चिंचवड इथे भरणार्या 89व्या साहित्य संमेलनाला खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावण्याचा साहित्य महामंडळाचा मानस आहे. मात्र, त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांना बोलवायला संयोजक, साहित्यिकांनी विरोध दर्शवलाय. तर साहित्य महामंडळ मात्र पंतप्रधानांना बोलवण्यावर ठाम आहे.
वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून देशभर साहित्यिक-कलावंत आपले पुरस्कार परत करत असताना, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधानांना बोलावून वाद ओढवून घ्यायचा का, असा प्रश्न डॉ. पी.डी. पाटील यांना पडला आहे. परंतु, महामंडळाचे पदाधिकारी मात्र मोदी यांच्या नावावर अडून बसले असल्याचे कळते. त्यामुळेच आधी ठरलेल्या संमेलनाच्या 7 ते 10 जानेवारी या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत.
आता याबाबत साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि संमेलन संयोजन समिती यांच्यात चर्चा होणार आहे. आणि त्यानंतरच संयोजक आपली भूमिका स्पष्ट करतील.