देशातून परदेशात जाऊन यशस्वी होणा-यांची संख्या काही कमी नाही. मात्र हातात कोणतंही शिक्षण नसताना, कुणाची साथ नसताना आपल्या जीवनात त्या काळात लंडनसारख्या शहरात यशस्वी झालेल्या आजीबाई बनारसे यांची कथा ही नेहमीच स्फूर्तिदायक अशी राहिलेली आहे.
आता या आजीबाईंची कथा चक्क रंगभूमीवर येत असून येत्या ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या काळात या नाटकाचे प्रयोग लंडनसह संपूर्ण ग्रेट ब्रिटनमध्ये होणार आहेत. या प्रयोगांना तिथल्या रसिकांकडून चांगलीच मागणी आल्याचं या नाटकाच्या निर्मात्यांचं मत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.
हे नाटक ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या सरोजिनी वैद्य यांनी लिहिलेल्या-राजहंस प्रकाशनाच्या गाजलेल्या पुस्तकावर आधारित असून ते नाटक रूपात मांडण्याचे काम राजीव जोशी यांनी केले आहे. आजीबाई बनारसे यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी असून एका तपानंतर त्यांचे रंगभूमीवर आगमन होत आहे.
महाविद्यालयीन स्पर्धेत सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून यशस्वी असलेली वेदांगी कुलकर्णी मीराची भूमिका करतेय. नाटकचे सादरकत्रे – कलामंदिर (कै. गोपीनाथ सावकार यांची नाटय़संस्था) अशोक सराफ, सुभाष सराफ, निर्माती स्मिता सराफ, सह-निर्माता-रवींद्र ढवळे, दिग्दर्शन-संतोष वेरुळकर, कला-दिग्दर्शन -अमर अजिंक्य, प्रकाशयोजना-रवींद्र ढवळे, रंगभूषा-शरद विचारे, संगीत-सुखदा भावे-दाबके, पार्श्वगायन -ओमकार शेंडे, अभिषेक नलावडे, वेशभूषा व रंगभूषा-ज्युईली शेंडे, सृजन सहाय्य-सुहास विरकर, निमिष सुरते, विश्वास महाशब्दे आहेत.
‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’मधल्या आजीबाई म्हणजे आजीबाई बनारसे म्हणजेच राधा डोमाजी डहाके ही चौंडी या विदर्भातील एका खेडयात जन्मलेली एक मुलगी (जन्म -१९१०. ५०च्या दशकात राधाबाई बनारसे म्हणून लंडनला जाते आणि घरकाम करता करता इथून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजीबाईची खानावळ काढते आणि काही वर्षात तिची खानावळ ही एक सामाजिक/सांस्कृतिक केंद्र बनते.
केवळ व्यवसाय न करता आपल्या विलायतेला येणा-या आपला देश-बांधवांना मायेचा आधार आणि घरचे अन्न देणारा-या आधुनिक अन्नपूर्णेने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. तेथील लोकांना आपल्या सण-परंपरा आणि एकूण संस्कृतीचा परिचय करून दिला आणि भिन्न देशवासीयांमध्ये एकात्मता निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
लंडनमध्ये नव्हे तर संपूर्ण युरोपात पहिले साई-मंदिर उभारणा-या आजीबाई बनारसे पाश्चात्य संस्कृतीत राहून भारतीय अस्सलता जपणा-या आजीबाई अशा या एका अशिक्षित बाईच्या अनोख्या परिश्रमाची, जिद्दीची कहाणी आहे.