१३ लाखांच्या बिलासाठी ४८ हजारांची लाच ! इगतपुरीत ग्रामसेवकासह तिघे ताब्यात

विकासकामांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  इगतपुरी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. धारगाव ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, सरपंचांचे पती आणि एका खासगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले असून या प्रकरणी तिघांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

१३ लाखांच्या बिलासाठी ४८ हजारांची लाच

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी धारगाव ग्रामपंचायती अंतर्गत ई-निविदा प्रक्रियेद्वारे नळपुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय आणि भूमिगत गटार यांसह एकूण सहा विकासकामे पूर्ण केली होती. या कामांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ७० हजार रुपये होती. त्यापैकी पाच कामांचे ९ लाख ७० हजार रुपयांचे बिल मिळाले होते. मात्र, उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक बाळू अंतु मांगटे (वय ४५) याने पाच टक्के कमिशनप्रमाणे ४८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच, लाच दिल्याशिवाय बिल मंजूर होणार नसल्याचेही त्याने ठेकेदाराला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

लाच स्वीकारताना तिघे रंगेहाथ ताब्यात

लाचेच्या मागणीला कंटाळलेल्या ठेकेदाराने १३ जुलै २०२६ रोजी नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली. पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने २८ जुलै रोजी घोटी परिसरात सापळा रचला. कारवाईदरम्यान ग्रामसेवक बाळू मांगटे याने सरपंचांचे पती पांडुरंग देवराम पुंजारा (वय २३) यांना लाच स्वीकारण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर शांताराम सोनू पादीर (वय ३८) या इसमामार्फत ग्रामसेवकासाठी ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. याचवेळी एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७, ७(अ) आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशीकर आणि पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनीही सहभाग घेतला

नागरिकांना ‘एसीबी’चे आवाहन

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *