लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पाळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन लवकरच कॉंग्रेसचे सरकार येईल, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.
प्रचारादरम्यान बोलताना गांधी म्हणाले, ‘पंतप्रधानांनी महागाई कमी होईल असे आश्वासन दिले होते. परंतु, डाळीची किंमत 70 रुपयांवरून 200 रुपये किलो पर्यंत नेऊन ठेवली आहे. ‘डाळ-रोटी खाओ प्रभू के गुण गाओ‘, असे नागरिक यापूर्वी बोलत होते. परंतु, आता ‘डाळ-रोटी मत खाओ प्रभू के गुण गाओ‘, असे मोदींना वाटत आहे. भाजपचे सरकार जाऊन लवकरच कॉंग्रेसचे सरकार येईल.‘
‘पंतप्रधानांनी परदेशातून काळा पैसा आणण्याचे व प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, एकही आश्वासन पूर्ण करू शकलेले नाहीत. सरकारने कोणताही विकास केलेला नाही,‘ असेही गांधी म्हणाले.