महाराष्ट्रावर काळे ढग दाटणार, पुढील २४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही काळ खंड पडला होता. आता राज्यात पावसाची नवी सर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याती घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र पसरलेलं आहे. त्याशिवाय मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवरील अनेक चक्रीवादळी प्रणालींमुळे मान्सूनचे नवे पर्जन्यमान आले आहे. या हवामान प्रणालींमुळे मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे. सोमवारी हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी केला होता. पण दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढल्यामुळे नंतर पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. शनिवारपासून मुंबईमध्ये अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पण मंगळवारपासून पावसाचा जोर सर्वत्र वाढण्याची शक्यता आहे. २२ जुलैपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी असेल.

कोकणात यलो अलर्ट

या आठवड्यात पावसाचा जोर वाढला तरी हवामान निरिक्षकांच्या मते, आगामी पावसाची तीव्रता जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी इतकी नसणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर या आठवड्यात मान्सूनची तीव्रता वाढली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळदार पावसाची शक्यता आहे. ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह कोकणात मुसळधार पाऊस होईल. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी २१ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस होणार?

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने डोंगराळ भागात व घाटमाथ्याच्या भागात पावसाचं रौद्र रूप दिसणार. पुणे जिल्ह्यात घाट क्षेत्रात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी राहील व हलक्या सरींची शक्यता आहे.

मराठवाड्यात स्थिती कशी असेल?

मराठवाड्यात मंगळावारी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी बरसतील. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्यी सरींची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र व खान्देशात किती पाऊस होईल?

नाशिकच्या घाट माथ्याच्या परिसरात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही अलर्ट दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *