जयपूर हे भारतातील सर्वात रॉयल शहर म्हणून ओळखले जाते. येथे राजे महाराजांच्या काळातील अनेक अलिशान महल तसेच बंगले आहेत. अनेक बंगले शंभर वर्षांहून अधिक जुने आहेत. येथील एका 100 वर्ष जुन्या बंगल्यात सोन्याने भरलेले 15 हंडे आणि 45KG चांदी सापडली. हा गुप्त खजिना रहस्यमयरित्या गायब झाला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजस्थानमधील अनेक जुन्या बंगल्यांखाली सोन्या-चांदीचा खजिना दडलेला असल्याचा दावा केला जातो. अलीकडेच, जयपूरमधील एका बंगल्याच्या मालकाने जुना बंगला पाडून नवीन बंगला बांधला. जेव्हा जुना बंगला पाडून त्याचा पाया खोदण्यात आला, तेव्हा कोट्यवधी रुपयांचा खजिना सापडला आहे.
बंगल्याखाली सापडलेला गुप्त खजिना क्षणात गायब झाला परकोटा येथील त्रिपोलिया बाजाराजवळ विद्याधर जी रस्त्यावर एक जुनी हवेली आहे. बापू नगरचे रहिवासी राहुल सेठी याचे मालक आहेत. सहा-सात महिन्यांपूर्वी, सेठी यांनी जुनी हवेली पाडून नवीन हवेली बांधण्याचे कंत्राट कंत्राटदार महेश मल्होत्रा यांना दिले होते. कंत्राट देताना अशी अट घालण्यात आली होती की, खोदकामादरम्यान कोणताही खजिना सापडल्यास मालकाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
हवेलीच्या खोदकामादरम्यान सोन्या-चांदीचा प्रचंड खजिना सापडला होता. सोन्या-चांदीच्या मोठ्या विटा, सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 15 कलश आणि सुमारे 10,000 चांदीची नाणी सापडल्याचा दावा राहुल सेठी यांनी केला आहे. कंत्राटदार आणि मजुरांनी हा खजिना गायब केला असा आरोप राहुल सेठी यांनी केला आहे.
मालकाने नावासह एफआयआर दाखल केला.
हवेलीचे मालक, राहुल सेठी यांनी जयपूरच्या मानक चौक पोलीस ठाण्यात कंत्राटदार महेश मल्होत्रा उर्फ छोटू तसेच त्याचे साथीदार अनुज, जगदीश, रजनी, रेहान, सुलतान (चालक) आणि पप्पू अजमेरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सेठी यांच्या म्हणण्यानुसार, एका मजुराने त्यांना या खजिन्याबद्दल माहिती दिली. या खजिन्याचा शोध आणि त्याचे वाटप करतानाचे दोन व्हिडिओ देखील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये खजिना देखील दिसत आहे. मानक चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश ख्यालिया यांनी सांगितले की, राहुल सेठी यांनी एफआयआर दाखल केला आहे. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
खजिना सापडला, तर त्यावर हक्क कोणाचा असतो?
भरातात खजिन्यांसंबंधी शतकानुशतके जुना कायदा आहे. 1878 च्या भारतीय खजिना शोध कायद्यानुसार, खोदकाम करून किंवा जमिनीखाली सापडलेल्या कोणत्याही खजिन्यावर सरकारचा हक्क असतो. राजस्थानमध्ये 19961 चे भारतीय खजिना शोध नियम देखील लागू आहेत. खजिना सापडल्यास, 1878 च्या भारतीय खजिना शोध कायद्याच्या तरतुदींनुसार, त्या खजिन्यावर सरकारचा हक्क असतो. जमीनमालकाचा या खजिन्यावर कोणताही हक्क नसतो. खजिना सापडल्यावर तात्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये दोषी आढळल्यास संबधीत व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
