लेकीच्या भेटीला आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याचा बेस्ट बस अपघातात अंत, पुण्याला जाताना काळाचा घाला; संतप्त जावयाचा प्रशासनाला सवाल

सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे ‘बेस्ट’ बस रस्त्याच्या शेजारील दुभाजकाला धडकल्याने सोमवारी झालेल्या अपघातात किमान दहा जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींपैकी आठ जण बसमधील प्रवासी होते, तर एक चालक आणि एक वाहक आहे; मृत व्यक्ती मात्र पादचारी होती. मुलीला भेटायला आलेल्या धाराशिवच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला.

लेकीच्या भेटीला आलेल्या शेतकऱ्याचा अंत

मराठवाड्यातील धाराशिवचे ६५ वर्षीय शेतकरी भास्कर रावसाहेब कागदे यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ते मुंबईत आपल्या एका मुलीला भेटण्यासाठी आणि कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. आपल्या दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी पुण्याला जाण्याच्या तयारीत असतानाच ‘बेस्ट’ बसच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

कुटुंबाचा संताप

कागदेंचे जावई सचिन पवार एका कनिष्ठ महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले, “बसमुळे आणखी किती बळी जाणार आहेत? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे यापूर्वीही काही अपघात झाले होते.”

अपघातग्रस्त बसचा चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (वय ५१) याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे; मात्र कंडक्टर वैभव वाघमारे यांच्या डोक्याला दुखापत होण्यासोबतच फ्रॅक्चर देखील झाले आहेत. या दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बहुतेक सर्वच जखमींना फ्रॅक्चर

सर्व प्रवाशांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यातील जवळपास सर्वांनाच फ्रॅक्चर झाले आहेत. रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. शुभांगी घोडके यांनी सांगितले की, “एकूण आठ रुग्णांपैकी सात जणांना शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात फ्रॅक्चर झाले आहेत. त्या सर्वांनाच दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागेल. एका रुग्णाला सायन रुग्णालयात हलवावे लागले; त्यांच्या हाताचे हाड मोडले असून मज्जातंतूवरही दाब आला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *