‘बसचालकाला आम्ही पुन्हा पुन्हा वेग कमी करण्यासाठी विनंती करत होतो. आम्हाला जिवाची काळजी वाटत होती. पण व्हिडीओ गेममध्ये गाडी चालवतात, तशी बस तो चालवत होता. शेवटी ज्याची भिती वाटत होती, तेच झाले. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि काही कळायच्या आत आम्ही बसमध्येच आपटलो आणि बाहेर फेकले गेलो…’ गोवंडी येथील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींच्या शब्दांमध्ये ही वेदना होती.
जखमींची अवस्था गंभीर
हातावर पोट असलेल्या या जखमींमध्ये कुणी रात्रपाळीहून घरी जात होते, तर कुणी आपल्या छोटेखानी व्यवसायासाठी नवी मुंबईच्या बाजारामध्ये फळे आणायला चालले होते. रुक्मिणी घोरपडे (५५) या रुग्णांची देखभाल करण्याचे काम करण्यासाठी बीएआरसी येथे जातात. बसचा अपघात झाला, तेव्हा त्या आतमध्येच इतक्या जोरात आदळल्या की, त्यांच्या नाकाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. हातावर पोट असलेल्या रुक्मिणी यांच्यापुढे आता कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न आहे. लता वाघेला (५५) यांचीही परिस्थिती वेगळी नाही. त्या नवी मुंबईहून फळे खरेदी करून मानखुर्दच्या भाजी बाजारामध्ये विकतात. त्यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले असून त्यासाठी तत्काळ शस्त्रक्रियेची गरज आहे.
