आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांवर गोळीबार करत आहे.
पाकिस्तानने रविवारी रात्रभर केलेल्या गोळीबारात सहा नागरीक जखमी झाले. शुक्रवारपासून सुरु असलेल्या या गोळीबारात आतापर्यंत बारा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.
महिनाभर शांतता पाळल्यानंतर शुक्रवार रात्रीपासून पुन्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सुरुवात केली. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पूँछ जिल्ह्यात एक नागरीक ठार झाला.
जम्मूच्या कथुआ, सांबा या जिल्ह्यामध्ये गोळीबार सुरु आहे. हिरानगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या १४ चौक्यांवर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला. पाकिस्तान गोळीबाराबरोबर उखळी तोफाही डागत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात हिरानगरमधील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.