ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत याआधी महायुतीमधील नेते एकमेकांच्या विरोधात लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण, निकालानंतर वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भाजप-शिवसेना महायुतीनं जोरदार विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय खेळीमुळे या बँकेवर वर्षानुवर्ष असलेलं बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व मोडीत काढण्यात महायुतीला यश आलं आहे. बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे अरुण बाळू पाटील तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या भाग्यश्री निलेश भोईर यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
प्रमुख उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये विभागून उभे
ठाणे जिल्हा बँकेच्या कार्यकारिणी निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ विरुद्ध ‘परिवर्तन पॅनल’ असा चुरशीचा सामना रंगला होता. मात्र, बहुजन विकास आघाडीची सत्ता पलटवून आपली सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पडद्यामागे प्लॅन रचला. या रणनीतीनुसार भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रमुख उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये विभागून उभे करण्यात आले होते. हा डाव यशस्वी ठरल्यानं यापूर्वी झालेल्या संचालकपदाच्या निवडणुकीत महायुतीचे तब्बल 14 उमेदवार निवडून आले होते, यामुळे बँकेची सत्ता महायुतीकडे जाणं आधीच निश्चित झालं होतं.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या रंजक अशा राजकीय घडामोडींमध्ये महायुतीच्या 14 तर बहुजन विकास आघाडीच्या 7 संचालकांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रक्रियेत पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले भाजपचे जेष्ठ नेते किसन कथोरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे अध्यक्षपदाच्या मतदानाच्यावेळी मात्र एकत्र आले.
एकनाथ शिंदेंसाठी इशारा?
पण, या मतदानादरम्यान महायुतीला एक धक्काही बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) एक मत फुटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अंतर्गत स्तरावर एक मोठा इशारा मानला जात आहे. बँकेवर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर अखेर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीची चावी महायुतीच्या हाती आली आहे. अरुण बाळू पाटील यांच्या रूपानं भाजपला अध्यक्षपद, तर भाग्यश्री निलेश भोईर यांच्या माध्यमातून शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळालं आहे. या विजयामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
