पोहण्याचा मोह अंगलट, अंदाज न आल्यानं दोघं बुडाले, बांबूच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू; एकजण बेपत्ता

नवी मुंबई जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील धोधाणी परिसरात काल रविवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वाघाची वाडी येथील गाडेश्वर धरणातीस नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेलं. या दुर्घटनेत विचुंबे येथील सुमित यशवंत पवार याचा मृत्यू झाला असून नयन म्हात्रे हा तरुण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 10 मित्रांचा एक ग्रुप काल रविवारी धोधाणी येथील वाघाची वाडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. अशा परिस्थितीत गाडेश्वर धरणातील नदीत पोहत असताना सुमित पवार आणि नयन म्हात्रे यांना पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते दोघेही वाहून गेले. दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला. ग्रुपमधील काही मित्र त्यांना लाकडी बांबूच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र, त्या दौघांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकजण अद्याप बेपत्ता आहे.

एकाचा मृत्यू तर एक बेपत्ता

घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केलं. अथक प्रयत्नांनंतर सुमित पवार याला पाण्याबाहेर काढण्यात यश आलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. दुसरीकडे नयन म्हात्रे याचा अद्याप कोणताही शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, नदीतील वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. धोधाणीचे पोलीस पाटील यांनी सांगितले की, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून शोधमोहीम सुरूच आहे.

संपूर्ण परिसरात शोककळा

या दुर्दैवी घटनेमुळे विचुंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्यात नद्या, ओढे आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह क्षणार्धात वाढू शकतो. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा करण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही अशा घटनांमध्ये तरुणांचे जीव जात असल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *