मांडवी एक्सप्रसेमध्ये तांत्रिक बिघाड, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; कोकणकन्या ८ तास विलंबाने

कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक शनिवारी कोलमडले. याचा परिणाम छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसवरही झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात ही गाडी तब्बल आठ तास उशिराने दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मांडवीमुळे संपूर्ण कोकण रेल्वेवर परिणाम

शनिवारी कोकणकन्या एक्स्प्रेस खेड स्थानकात पहाटे ३.०४ या नियोजित वेळेऐवजी सकाळी ११.१० वाजता दाखल झाली. या विलंबाला शुक्रवारी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची प्रत्येक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेल्या मांडवी एक्स्प्रेसच्या थर्ड इकॉनॉमी एसी डब्यांतील वातानुकूलन यंत्रणा खेड स्थानकापासूनच बंद पडली.

त्यामुळे डब्यातील प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. उकाड्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर मांडवी एक्स्प्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून तिचे इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, कोकणकन्या एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

क्रॉसिंगमुळे आणखी विलंब

मांडवी एक्सप्रेसच्या विलंबामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी कोकणकन्या शुक्रवारी उशीरा रवाना झाली. या गाडीला सुटण्यासाठी मध्यरात्रीचे सुमारे ३ वाजले. त्यानंतरही अनेक ठिकाणी क्रॉसिंगसाठी कोकणकन्या थांबवण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पण हे सर्व बिघाड दूरस्थ करून सर्व गाड्या सुरळीत धावत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

मान्सूनचं वेळापत्रक लागू

१५ जूनपासून कोकण रेल्वेवर मान्सूनचं वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या डोंगराळ भागातून जात असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनवर वेगमर्यादा लावण्यात आली आहे. यामुळे ट्रेन नेहमीपेक्षा उशीराने धावत असून अशा तांत्रिक बिघाडांमुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं.

कोकण रेल्वे मार्गावर अनेक बोगदे, पूर आणि तीव्र वळणं आहेत. मुसळधार पाऊस झाला तर दरडी कोसळतात, दृश्यमानता कमी होते. यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी वेगमर्यादा ताशी १२० किमी वरून थेट ताशी ७५ ते ९० किमी करण्यात आली आहे. त्यात मान्सूनपूर्व कामंसुद्धा कोकण रेल्वेवर सुरु आहेत. त्यामुळे देखभालींच्या कामासाठी प्री-एनआय ब्लॉक घेतले जातात. यामुळे गाड्यांना ३ ते ५ तास विलंब होतो. तसेच, कोकण रेल्वेवर सिंगल लाइन ट्रॅक असल्यामुळे एका गाडीला झालेल्या विलंबाचा परिणाम पुढील गाड्यांवरही होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *