एका कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याच्या प्रकाराचा सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींकडून निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणात नागपूर शहर भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनीही अंजली भारती यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडीने पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची भेट घेत कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन सादर केले. महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष दिव्या धुरडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अंजली भारती यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक व्यासपीठावरून एका महिलेबद्दल अशा प्रकारचे असभ्य वक्तव्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेचे आहे, असे धुरडे म्हणाल्या. या प्रकरणात संबंधित गायिकेवर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी काळात भाजप महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळात भाजप महामंत्री श्रीकांत आगलावे, महामंत्री रितेश गावंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे, अश्विनी जिचकार, युवा मोर्चा युवती अध्यक्ष प्रशंसा भोयर, मनीषा अतकरे, सीमा ढोमने, मोहिनी रामटेके, मधुर भांडारकर व इतर भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
काँग्रेस नेत्यांकडूनही निषेध
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर स्त्रियांचा सन्मान, स्वाभिमान आणि समानतेचा पुरस्कार केला. त्यामुळेच्या बाबासाहेबांच्या विचारांच्या नावाखाली कोणत्याही स्त्रीवर वैयक्तिक टीका टिपणी करणे हे त्यांच्या मूल्यांना धरून नाही. राजकीय मतभेद असू शकतात, पण स्त्रियांच्या सन्मानावर आघात करणारी भाषणे आम्ही कधीही स्वीकारणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. राजकारणात सरकार, त्यांची धोरणे आणि विचारसरणीबाबत मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, अशा वादात कोणाच्याही खासगी आयुष्याबद्दल किंवा कुटुंबीयांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करणे ही आपली संस्कृती नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
