मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीने मागील अनेक वर्ष प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र आता प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून, येत्या काही महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
सध्या लोणावळा – खंडाळा घाटावरील प्रवास काही वेळा कंटाळवाणा आणि धोकादायक ठरतो. मात्र, 14 किमी लांबीचा हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना घाटातील वळणातून जात वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची गरज नाही. प्रवासाचे अंतर 6 किमीने कमी होणार असून जवळपास 25 ते 30 मिनिटं इतकी वेळेची बचत होईल, हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
या प्रकल्पात अभियांत्रिकीचा खास चमत्कार करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या डोंगर-रांगामध्ये उभारलेला 180 मीटर उंच Keel-Stayed ब्रिज आणि दोन भव्य बोगदे तयार आहेत. यामुळे मुंबई – पुणे प्रवास सुरक्षित आणि वेगवान होईल. बोगद्यांचं काम सध्या 98 टक्के पूर्ण झालं असून, शेवटचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. मुख्य बोगदा 8.87 किमी, तर दुसरा 1.67 किमी लांब आहे.
