सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने बऱ्याच ग्रामीण भागात आणि गावोगावी कीर्तन सोहळे साजरे होत आहेत. रात्री उशिरापर्यंत गावागावात कीर्तनाचे सोहळे संपन्न होत आहेत. असाच सोहळा परभणी तालुक्यातील पिंपळा या गावामध्ये चालू होता. या कीर्तन सोहळ्यासाठी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील तिघेजण पिंपळा या गावी आले होते.
वारकरी संप्रदायावर शोककळा
रात्री उशिरापर्यंत कीर्तनाचा आस्वाद घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे दुचाकीवर निघाले. परभणी-जिंतूर रोडवरून जाताना परभणीच्या झरी गावाजवळ लोअर दुधना कालव्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अन् कारचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात तीनही वारकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या वारकऱ्यांमध्ये ह.भ.प माऊली दिगंबरराव कदम (वय 30) ह.भ.प प्रसाद राव कदम (वय 45, वर्ष दोघेही राहणार बोर्डिंग तालुका जिंतूर) आणि ह.भ.प दत्ता माणिकराव कराळे (वय 30, रा. मुळा तालुका जिंतूर) अशी मयतांची नावे आहेत. तिघंही वारकऱ्यांचा करुण अंत झाल्यानं वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
संपूर्ण गावात हळहळ
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली कदम, दत्ता कराळे आणि प्रसाद राव कदम हे तिघेही परभणी तालुक्यातील पिंपळा येथे काल रात्री कीर्तनासाठी गेले होते. रात्री उशिरा एकच्या सुमारास किर्तन सोहळा संपल्यानंतर तिघेजण दुचाकीवर परभणी-जिंतूर या महामार्गाने आपल्या बोर्डी गावाकडे निघाले. गावाकडे जात असताना झरी गावाजवळ असलेल्या लोअर दुधना कालव्याच्या परिसरात त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्याचं कळाल्यानंतर लगेचच या तिघांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, तिघांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मयत घोषित केले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी थेट दुसरीकडे जाऊन पडली होती.
