31 डिसेंबरला पुण्यातील गडकिल्ल्यांवर बंदी, तरुणांच्या हुल्लडबाजीवर कडक कारवाई; ‘या’ किल्ल्यांचा समावेश

पुणे परिसरातील टेकड्या, संरक्षित वनक्षेत्र आणि जिल्ह्यातील किल्ल्यांच्या परिसरात वन विभागातर्फे बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळपासूनच गस्त वाढविण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जंगल, टेकड्यांवर मद्यपानासह होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागातर्फे रात्रीही बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. सिंहगड, राजगड-तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची अशा विविध किल्ल्यांवर ३१ डिसेंबरला मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यवर्ती पुणे-उपनगरांतील हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी शहराबाहेर निर्मनुष्य भागात, जंगल पायथ्याला, डोंगर-दऱ्यांमध्ये तंबू टाकायचा आणि कुणाच्याही बंधनाशिवाय रात्रभर धमाल करायची, अशी मानसिकता वाढते आहे. काही पर्यटन कंपन्यांनी अलीकडे निसर्गाच्या कुशीत नवीन वर्षाचे स्वागत ही संकल्पना लोकप्रिय केली आहे. प्रामुख्याने मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, भोर-राजगड या भागांतील वन क्षेत्रालगत अनेक फार्महाउस असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने नाताळच्या सुट्ट्यांमध्ये या भागात राहायला जातात.

पर्यटनाला मिळणारा प्रतिसाद पाहून काही संयोजक संरक्षित वनक्षेत्रात, जलाशयांच्या लगतच्या रिकाम्या जागांवर गेट-टुगेदर, बार्बेक्यू पार्ट्यांचे आयोजन करीत आहेत. या कार्यक्रमांमधील गोंगाटामुळे जंगलातील वन्य प्राण्यांच्या वावरावर बंधने येत असून, उपद्रवी लोकांकडून दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा जंगलात फेकणे, माळरानांवर वणवा पेटविल्याच्या घटना निदर्शनास आल्याने वन विभागातर्फे गेल्या दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरला सकाळपासूनच बंदोबस्त वाढविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी वनाधिकाऱ्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आणि गावातील स्वयंसेवी संस्थांनाही या कामात सहभागी करून घेतले आहे.

सिंहगडावर वाहनांची तपासणी
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक उत्साही मंडळी मोठ्या संख्येने सिंहगडावर जातात. वन विभागाच्या नियमानुसार गडावर मांसाहार आणि मद्यपानास बंदी आहे. तरीही पर्यटकांकडून दारूच्या बाटल्या चोरून गडावर नेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वन कर्मचारी आणि सिंहगड घेरा समितीच्या कार्यकर्त्यांकडून गडाच्या पायथ्याला टोलनाक्यावरच प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर वर जाणारी वाहने थांबविण्यात येतील. याच वेळी गडावर फिरायला गेलेल्या पर्यटकांनाही खाली पाठविण्यात येणार आहे. सहानंतर गड पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *