मतदानासाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी न दिल्यास होणार ही कारवाई

राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापनामधील सर्व कर्मचाऱ्यांना १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांमध्ये भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये काही संस्था,आस्थापना त्यांच्या कामगारांना मतदानाची भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत असे आढळून आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते.

त्यानुसार १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.उद्योग आणि कामगार विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे.

ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांना लागू राहील.

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थपनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *