देशातील सहा राज्यांना जोडणारा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. इतकंच नव्हे तर या महामार्ग दोन तीर्थक्षेत्रांनाही जोडतो. प्रशासनाकडून सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे उभारण्यात येत आहे. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक चेन्नई द्रुतगती मार्ग. नाशिकमधून हा महामार्ग जात असल्याने शहरात सहा पदरी एक्स्प्रेसवे उभारला जात आहे.
सुरतवरुन चेन्नईला जोडणाऱ्या या सर्वात महत्त्वाच्या कॉरिडोरमध्ये नाशिक-चेन्नई द्रुतगती महामार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. नाशिकमधून जाणाऱ्या या सहा पदरी मार्गामुळं शहराला देशाच्या पश्चिम व दक्षिण भागातील प्रमुख सागरी मार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. इतकंच नव्हे तर या महामार्गाला थेट पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी जोडणी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त थेट चेन्नई बंदराशीही जोडला जाणार आहे.
या महामार्गामुळं नाशिककरांना देशातील दोन प्रमुख बंदराशी जोडणी मिळणार आहे. त्यामुळं मालवाहतूक आणि व्यापाऱ्याच्या नव्या संधी मिळणार आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही हा महामार्ग महत्त्वाचा आहे. सूरत चेन्नई एक्स्प्रेसवे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या सहा राज्यांना जोडतो.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेनंतर हा देशातील सर्वात लांब दुसरा लांब द्रुतगती मार्ग ठरणार आहे. नाशिकवरुन चेन्नईकडे जाताना हा मार्ग थेट आंध्रप्रदेशात जाऊन तिरुपतीला थेट जोडणी उपलब्ध होत आहे.पूर्वी या प्रवासासाठी 22-23 तासांचा वेळ लागायचा मात्र आता नव्या एक्सप्रेसमुळं तो 12 तासांवर येणार आहे.हा प्रकल्प दोन प्रमुख टप्प्यात राबवला जात असून नाशिक अक्कलकोट सहा पदरी द्रुतगती मार्गाचे 374 किमी अंतर समाविष्ट आहे. त्यामुळं सध्या नाशिक ते अक्कलकोट अंतर 524 किमी असून सध्या प्रवासाचा वेळ 9 तास आहे. तर, नव्या मार्गामुळं अंतर 150 किमी होऊन प्रवासाचा वेळ 4 तासांवर येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प BOT तत्वावर विकसित केला जात आहे.
नाशिकमध्ये हा मार्ग मुंबई-आग्रा महामार्गाला आडगाव येथील ट्रक टर्मिनलवरून थेट जोडला जाईल. तसेच गोंदे-दुमाला येथे तवा नाशिक एक्सप्रेसवेशी हा मार्ग जोडला जाणार असून, याच जोडणीद्वारे वाढवण बंदरापर्यंत थेट प्रवेश मिळेल. सिन्नर तालुक्यातील वावी येथून हा मार्ग समृद्धी महामार्गालाही जोडला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि सुमारे 70 गावांमधून हा दृतगती मार्ग जाणार असून, यासाठी अंदाजे 195 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. मार्गावरील प्रमुख शहरांमध्ये नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे
