नवऱ्याला बिझनेस करायचा होता, पण…; कोल्हापुरातील विवाहित तरुणीकडे अजब मागणी, आई-बाबांच्या घरी ती नको करून बसली!

गेल्या काही दिवसात सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना कोल्हापुरात उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता इचलकरंजी येथील चंदूर येथेही अशीच एक घटना घडली आहे. पैशांसाठी सासरच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हातकणंगले तालुक्यातील चंदूरमध्ये असणाऱ्या शाहूनगरमधील 22 वर्षीय विवाहिता महेर इरफान मुजावर हिने पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. शनिवारी सायंकाळी माहेरी लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन महेरने आत्महत्या केली आहे. पतीच्या व्यवसायासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याच्या वारंवारच्या मागणीमुळे तिला सतत त्रास सहन करावा लागला होता. या प्रकरणी तिचे वडील सलीम बाबू कडगे यांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विवाहानंतर सुरू झाला अमानुष जाच…
महेर इरफान मुजावर (22, रा. शाहूनगर, चंदूर) यांचा विवाह बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील इरफान निजाम मुजावर (वय 25) याच्याशी झाला होता. लग्नानंतर पतीच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून केली गेली. ही मागणी पूर्ण न झाल्याने महेरला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. तिला नांदायलाही घेऊन जात नसल्याने ती माहेरीच राहत होती. या सततच्या तणावामुळे असह्य होऊन तिने माहेरच्या घरी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. तिचे वडील सलीम बाबू कडगे (वय 52) हे यंत्रमागावर काम करतात आणि त्यांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडे धाव घेतली. तातडीने कोल्हापुरातील शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोल्डन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

पाच जणांवर गुन्हा दाखल..
या प्रकरणाची फिर्याद सलीम बाबू कडगे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पती इरफान निजाम मुजावर (वय 25, रा. बोरगाव, चिक्कोडी), सासू चाँदबी निजाम मुजावर (वय 55), जाऊ समीना अख्तर मुजावर (वय 35, तिघे रा. बोरगाव), नणंद शाहिदा आणि नणंदेचा पती फारुख (दोघे रा. कोल्हापूर) या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, क्रूरतेने वागणे याबाबत आणि इतर संबंधित कलमांनुसार या गुन्ह्याची नोंद केली असून, तपास सुरू आहे.

सततचा सासरच्या मंडळींचा जाच
पोलिसांनी माहितीनुसार, विवाहानंतर महेरला सासरच्या घरी राहता आले नाही. पतीने व्यवसायासाठी पैसे मागितले, पण माहेरकडून न मिळाल्याने तिला मारहाण, अपशब्द वापरुन मानसिक त्रास दिला जात होता. ती माहेरी परत आली तरी फोनद्वारे आणि सतत भेटी घेऊन जाच कायम ठेवला. या घटनेमुळे स्थानिक भागात खळबळ उडाली असून, विवाहितांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना वाढत असल्याने विवाहितांच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वादांमुळे होणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र यावे, असे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *