ठाणे आणि भिवंडी शहराची वाहतूक कोंडीमुळं नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी भिवंडीतून ठाण्यात येण्यासाठी तब्बल पाऊण तास लागतो. नागरिकांचा हाच त्रास कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी हे शहर आता औद्योगिक केंद्र म्हणून नावारुपास येत आहे. येथे अनेक उद्योगधंदे आहेत. त्यामुळं शहरातून मोठ्या संख्येने अवजड वाहने मुंबईच्या दिशेने येत असतात. त्यामुळं मोठी वाहतूक कोंडी होते. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी 45 मिनिटांचा वेळ वाया घालवाला लागतो. लवकरच एमएमआरडीएने एक खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलशेत – काल्हेर खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी निविदा प्रक्रिया राबववून एका कंपनीची नियुक्ती केली. एमएमआरडीएकडून कोलशेत – काल्हेर खाडीपुलाच्या संकल्पन आणि बांधकामासाठी गुरुवारी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एमएमआरडीएने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार कोलशेत – काल्हेर खाडीपूल सहापदरी आणि 2.2 किमीचा आहे. या पुलाचा खर्च 274 कोटी रुपयांवरुन आता 430 कोटी रुपयांवर गेला आहे. निविदेनुसार या प्रकल्पाच्या संकल्पन आणि बांधकामासाठी 36 महिन्यांचा अर्थात तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संकल्पन पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
भिवंडी – ठाणे प्रवास वाहनचालक – प्रवाशांना किमान 45 मिनिटे वाया घालवावी लागतात, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवाशांची ही अडचण, गैरसोय लक्षात घेऊन एमएमआरडीएने ठाणे – भिवंडी प्रवास सुकर आणि अतिजलद करण्यासाठी कोलशेत – काल्हेर खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला.
