दुपारी मधल्या सुट्टीत जेवायला घरी आला, पण परत शाळेत गेलाच नाही; मित्र शोधत घरी आले आणि… भयंकर घटनेने हळहळ

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 10 नोव्हेंबर रोजी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आर्यन सचिन काटकर (रा. कुसळंब. ता, बार्शी) असं आत्महत्या केलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचं नाव आहे. आर्यन जेवणाच्या सुट्टीत घरी आला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. बार्शी पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

आई – आजोबा शेतात गेले आणि वडील दुसऱ्या शहरात गेले होते –

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता आर्यनचे आई, आजोबा शेतात गेले होते. आजी कार्यक्रमासाठी बार्शी येथे गेली होती, तर वडील दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी येथे गेले होते. आर्यन इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. तो सकाळी शाळेत गेला आणि दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो घरी जेवण्यासाठी आला.

दुपारी जेवायला घरी आला तो परत शाळेत गेलाच नाही

पुन्हा दुपारी शाळेत आला नसल्यामुळे त्याचे मित्र त्याला बघण्यासाठी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी आर्यन काटकर हा स्वतःच्याच घरात लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेला अवस्थेत दिसला. हे पाहून आर्यनच्या मित्रांच्या पायाखालची जमीन सरकली.

अंग गरम होते म्हणून बार्शी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं –

आर्यनच्या मित्रांनी गळफासाचं दृश्य पाहून ताबडतोब आरडाओरडा करत लोकांना बोलावलं. शेजारील लोक जमा झाले. आर्यनच्या चुलत्याला फोन केला. त्यांनी येऊन पाहिलं असता, आर्यनचे अंग गरम लागत होतं. त्याला तात्काळ खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचारासाठी दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं. याबाबत बार्शी तालुका पोलिसात वैद्यकीय अधिकारी अडसूळ यांनी माहिती दिली असून, पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *