एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला करण्याच्या बातम्या आपण मागील काळात अनेकदा वाचल्या आहेत. सध्या देशात काही ठिकाणी दोन देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे, मग ते रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष असो! मात्र तुम्ही एखाद्या देशाने स्वत:च्याच भूभागावर हवाई हल्ला केल्याचं कधी ऐकलंय किंवा वाचलंय का? आपल्याच देशात हवाई हल्ला करुन मोठ्या संख्येनं जीव घेण्याचं कृत्य कोणता देश करु शकतो? हे असं शक्यच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर पाकिस्तानने हा अजब प्रकार केलाय, असं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो! विशेष म्हणजे दुबईमधील भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे दोन्ही देशातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच हा सामना संपल्यानंतर दोन तासांच्या आत पाकिस्तानने ही कारवाई केलीये.
30 नागरिकांचा मृत्यू
काही महिन्यांपूर्वी भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने आता आपल्याच देशातील खैबर पख्तुनख्वामध्ये नरसंहार केला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने खैबर पख्तुनख्वामध्ये हवाई हल्ला करत बॉम्ब फेकले. या हल्ल्यांमध्ये 30 नागरिकांचा मृत्यू झाला. या हवाई हल्ल्यानंतर खैबर पख्तुनख्वामधील मात्रे दारा या गावात स्थानिक महिला आणि पुरुषांच्या मृतदेहांचा खच पाहायला मिळाला.
किमान आठ एलएस-6 बॉम्ब
स्थानिक प्रसारमाध्यमे आणि वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवार आणि सोमवारी पहाटे 2 वाजता, पाकिस्तानी हवाई दलाच्या जेएफ-17 लढाऊ विमानांचा वापर करून तिराह खोऱ्यातील एका गावावर किमान आठ एलएस-6 बॉम्ब टाकले. या हवाई हल्ल्यात पाच घरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 20 लोक जखमीही झाले.
मरण पावलेल्यांची संख्या भरपूर मोठी
पाकिस्तानने यापूर्वीही खैबर पख्तुनख्वामध्ये अनेकदा ‘दहशतवादविरोधी कारवाया’ म्हणत हल्ले केलेत. या प्रदेशात अशा स्वत:च्याच देशाने केलेल्या कारवाईमध्ये मरण पावलेल्यांची संख्या भरपूर मोठी असल्याचं सांगितलं जातं.
अनेक पोलिसांचा मृत्यू
खैबर पख्तूनख्वामधील पोलिसांच्या मते, या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान प्रांतात 605 दहशतवादी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये किमान 138 नागरिक आणि 79 पाकिस्तानी पोलिसांचा मृत्यू झाला. ऑगस्टमध्येही हिंसाचाराच्या 129 घटनांची नोंद झाली, ज्यात सहा पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी संघीय कॉन्स्टेब्युलरी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
खैबर पख्तूनख्वा फार आधीपासूनच चर्चेत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करत नष्ट केले. आता, समोर आलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिदीन (एचएम) सारख्या दहशतवादी संघटना अफगाण सीमेजवळ खैबर पख्तूनख्वामध्ये नवीन अड्डे स्थापन करत आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला हा डोंगराळ प्रदेश दहशतवाद्यांसाठी लपण्याचे एक प्रमुख ठिकाण झाला आहे. 1980 च्या दशकातील सोव्हिएत विरोधी अफगाण युद्ध आणि 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणादरम्यान बांधलेले तळ अजूनही या प्रांतात अनेक भागात आहेत.
