रक्तपेढ्यांवर आरोग्य विभागाचा बडगा; वार्षिक 2000 युनिट रक्तसंकलन नसेल तर बंदीचे संकेत

राज्यात आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वार्षिक दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असलेल्या रक्तपेढ्यांनी शिबिरांचे आयोजन करून, रक्तदानासंदर्भात जनजागृती निर्माण करून रक्तसंकलन वाढवण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत. रक्ताचे योग्य संकलन होत नसेल तर अशा रक्तपेढ्या सुरू ठेवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून या रक्तपेढ्या बंद करण्याचे संकेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रामधून रक्तपेढ्यांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. लोकसंख्येनुसार रक्तपेढ्यांची उपलब्धता गरजेची असताना अतिरिक्त रक्तपेढ्यांची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने २१ सप्टेंबर २०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार रक्तकेंद्रांचे स्वेच्छिक वार्षिक रक्तसंकलन दोन हजार युनिटपेक्षा अधिक असायला हवे. या निर्देशांना दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.

४ टक्के रक्त इतर राज्यांत
रक्तसंकलन केल्यानंतर निर्धारित कालावधीमध्ये ते वापरणे अपेक्षित असते. त्यानंतर ते फेकून द्यावे लागते. अनेक रक्तपेढ्या गरजेनुसार संकलन करत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त संकलित रक्ताचे आम्ही काय करणार, असा प्रश्न करून ते इतर राज्यांना पाठवले जाते. या प्रकारासह यातून पळवाट काढून रक्ताची अवैध विक्री करणाऱ्या पेढ्यांमधील गैरप्रकारही ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उघडकीस आणले होते. रक्ताची राज्याची गरज पूर्ण झालेली नसताना राज्यातील ३९ रक्तपेढ्यांनी ४० टक्क्यापेक्षा अधिक रक्त अन्य राज्यांना पाठवले. यासंदर्भातील माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेने मागवली होती.

योग्य नियोजन आवश्यक
महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, कॉर्पोरेट कार्यालयांच्या माध्यमातून तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत रक्तसंकलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सुदृढ रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. राज्यामध्ये शंभरपेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या मोठी आहे. रक्ताचा योग्य प्रकारे विनियोग होतो, हा विश्वास रक्तदात्यांना मिळाला तर ते पहा रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाळी दिवसांमध्ये रक्ताची अधिक गरज लागते. त्यामुळे त्यावेळी रक्ताची उपलब्धता होण्यात अडचण येणार नाही, यादृष्टीने रक्ताचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *