ग्राहक तक्रार निवारण कायदा नेमका कसा काम करतो आणि ग्राहकाला यामुळं कसा न्याय मिळते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून, इथं एका लोकप्रिय बिस्कीट उत्पादक कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दणका दिल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्याअंतर्गत बिस्कीट उत्पादक कंपनी आणि दक्षिण मुंबईच्या चर्चगेट येथील एका केमिस्टला ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कम देण्यच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार तक्रारदार 32 वर्षीय व्यक्ती आयटी क्षेत्रात नोकरी करत असून त्यांनी चर्चगेट स्टेशन परिसरातून नोकरीवर जात असताना बिस्कीटाचा पुडा खरेदी केला. दोन बिस्कीटं खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ आणि उलटीसारखं वाटू लागलं. ज्यानंतर त्यांनी लगेचच बिस्कीटाचं पाकिट पाहिलं आणि त्या जिवंत अशी पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
सदर घटनेनंतर ग्राहक महिला दुकानावर जाऊन तिथं घडला प्रकार सांगितला. मात्र प्राथमिक स्वरुपात दुकानदारानं या तक्रारीला फार वाव दिला नाही, ज्यानंतर या महिलेनं कंपनीच्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधला. पण, तिथंही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याचं पाहून…
प्रतिसाद मिळत नसून आपल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याचं पाहून या महिलेनं बिस्कीटाचं पाकिट, त्यावरील माहितीचा तपशील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अन्न व प्रशासन विभागाकडे सुपूर्त केला. ज्यानंतर प्रयोगशाळेतील चाचणीनंतर त्या बिस्कीटाच्या पाकिटात अळी असल्याचं आणि त्याच्या सेवनानं मानवी जीवनास हानी पोहोचणार असल्याचं अधिकृतरित्या सिद्ध झालं.
कंपनीकडून कोणतंही उत्तर नाही
पालिकेच्या विभागानं दिलेल्या माहितीच्या बळावर महिलेनं कंपनीला 4 फेब्रुवारी 2019 मध्ये कायदेशीर नोटीस बजावर नुकसानभरपाईची मागणी केली. कंपनीकडून कोणतंही उत्तर न आल्याचं पाहता ग्राहक महिलेनं पोलीस तक्रारसुद्धा दाखल केली. हा वाद आयोगापुढं पोहोचला असता कंपनीच्या उत्पादनांमध्ये सर्वोच्च दर्जाचे मानदंड पाळले जातात, असा युक्तिवाद करत कंपनीनं आरोप सपशेल फेटाळले. तर, केमिस्टनंही अशी काही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचं सांगत आपण सीलबंद उत्पादनंच विकत असल्याचं सांगितलं.
दरम्यान अळ्या असलेल्या बिस्कीटांची विक्री करणं हे अन्न सुरक्षा कायदा व ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याची बाब अधोरेखित करत बिस्किटामध्ये जिवंत अळी सापडली याचा अर्थ उत्पादन दूषित आणि सदोष असल्याचं सिद्ध होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं. किंबहुना पालिकेच्या फूड लॅबनेही हे सिद्ध केलं असताना त्या अहवालाला कंपनीने आव्हान दिलं नाही, असं ग्राहक आयोगाने म्हटलं.
सदर घटनेमुळं तक्रारदार महिलेला मानसिक आणि शारीरिक
त्रास सहन करावा लागल्याचं निरीक्षणही आयोगाने नोंदवत सदर लोकप्रिय बिस्कीट उत्पादन कंपनीनं महिलेला 1.50 लाख रुपये आणि ज्या दुकानातून बिस्कीटचा पुडा खरेदी केला त्या दुकानदारानं 25000 रुपये अशी एकूण 1 लाख 75 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी असा आदेश देत त्यासाठी न्यायालयानं 45 दिवसांचा कालावधी दिला.
वरील कालावधीत नुकसानभरपाई देण्यात आली नाही, तर वरील रकमेवर 9 टक्के प्रतीवर्ष इतक्या व्याजदरानं पूर्ण भरपाई देण्याच्या सूचनाही कायद्यानं दिल्या.
