सासरच्या छळाला कंटाळून महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील दळवीनगरमध्ये घडली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लाल लिपस्टिकने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ‘माझ्या नणंदेच्या छळामुळे हा निर्णय घेत आहे,’ असे या ‘सुसाईड नोट’मध्ये नमूद आहे.
काय आहे प्रकरण?
मयुरी शशिकांत देशमुख, वय 31 वर्ष, व विश्वजित शशिकांत देशमुख, वय सहा वर्ष, अशी आत्महत्या केलेल्या मायलेकांची नावे आहेत. मयुरी यांचा पती शशिकांत त्र्यंबकराव देशमुख, वय 38 वर्ष, तिघे रा. कल्पकसृष्टी, दळवीनगर, आंबेगाव, याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह सासू रमाबाई त्र्यंबकराव देशमुख, वय 65 वर्ष, रा. घाटपुरी नाका, खामगाव, आणि नणंद मेघा रवींद्र देशमुख, वय 35 वर्ष, रा. येवदा, दर्यापूर, यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, मयुरीचा भाऊ सचिन ठाकरे, वय 24 वर्ष, रा. खामगाव, याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सात वर्षांपूर्वी विवाह
मयुरी आणि शशिकांत यांचे 2018 मध्ये लग्न झाले. त्यानंतर मयुरीची सासू आणि नणंद दोघी तिला विविध कारणांवरून सातत्याने टोमणे मारून अपमानित करीत असत. त्यामुळे शशिकांत आणि मयुरी लहान मुलासह पुण्यात राहायला आले. शशिकांत चालक असून, मयुरी नर्सरीत शिकवत होती. शशिकांत मयुरीवर संशय घेऊन मारहाण करायचा.
मयुरीच्या भावाने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मयुरीचा पती शशिकांत देशमुख याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याच्याकडे चौकशी करून मयुरीची सासू आणि नणंदेला अटक करायची आहे, आरोपी मयुरीला कोणत्या कारणावरून त्रास देत होते, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी उपनिरीक्षक मोहन कळमकर व सरकारी वकील अमर ननावरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.