मुंब्रा स्थानकाजवळील ते वळण तसंच राहणार; तर 15 डब्यांच्या लोकल…; मध्य रेल्वेने केले स्पष्ट

मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात चार जणांनी प्राण गमावले होते. या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली होती. लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि त्यातून हा अपघात झाल्याचे मध्य रेल्वेने म्हटलं होतं. तसंच, या अपघातानंतर मध्य रेल्वेने उपाययोजना आखत आता स्वयंचलित दरवाजाच्या लोकल सेवेत आणणार असल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर या अपघाताची चौकशीदेखील केली जात होती. मुंब्रा स्थानकातील त्या धोकदायक वळणामुळं अपघात झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्या वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान असलेल्या तीव्र वळणामुळं हा अपघात घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर विशेष चाचणी घेण्यात आली. त्यावेळी दोन ट्रेन 75 किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आल्या व त्यातील अंतराचेही मोजमाप करण्यात आले. या चाचणीत कोणताही धोका नसल्याचे आढळून आले.

मुंब्रातील त्या वळणाची रचना नियमानुसारच करण्यात आली आहे. या भागात लोकलच्या गतीची मर्यादा 105 किमी प्रतितास आहे. गर्दीच्या वेळेत रोज 180 हून अधिक लोकल या मार्गावर एकमेकांना क्रॉस करुन पुढे जातात, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

15 डब्यांची लोकल धावणार

मध्य रेल्वे आता प्रवाशांसाठी 15 डब्यांची लोकलची संख्या वाढवण्याचे काम गतीने सुरू आहे. काही तांत्रिक व भौगोलिक अडचणी असूनही रेल्वे प्रशासन त्या दूर करून जास्त क्षमतेच्या गाड्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *