मुंबई गोवा हायवेची गरज नाही; आता थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणात जाता येणार

मुंबई गोवा महामार्ग हा कोकणात जाणार महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. मागील 12 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. अद्यापही मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आता स्वत:चे वाहन घेऊन कोकणात जायचे असल्यास मुंबई गोवा महामार्गाची गरज नाही. कारण, आता प्रवाशांना  थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणात जाता येणार आहे. कोकण रेल्वेच्या या भन्नाट योजनेमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा जबरदस्त फायदा होणार आहे. जाणून घेऊया ही योजना नेमकी आहे तरी काय?

कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी या योजनेची माहिती दिली. मागील अनेक वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर रो रो रेल्वे सुरु आहे. या रो रो सेवेअंतर्गत ट्रक रेल्वेत लोड करुन एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जातात. या धर्तीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता त्यांची खाजगी वाहने अर्थात चार चाकी वाहने रेल्वे नेता येणार आहेत. म्हणजे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील ही रो रो रेल्वे सुरु केली जाणार आहे.

गणोत्सव हा कोकणातील अत्यंत महत्वाचा सण आहे. हजारो चाकरमानी गणपती सणासाठी कोकणात जातात. गणपती सणाच्या काळात कोकणातील गर्दीचा विचार करता, कोकण रेल्वे हा रो रो सेवेचा खास प्रयोग करणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कार किंवा SUV रेल्वेवर घेऊन जाता येणार आहे. सध्या ट्रक नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या “Ro-Ro” सेवेचा वापर खासगी वाहनांसाठी करण्याची चाचपणी केली जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फोर व्हिलरचे माप आणि डिझाईन लक्षात घेऊन वॅगनमध्ये काही बदल केले जाणार आहेत.

Ro-Ro (Roll-on Roll-off) ही सेवा म्हणजे ट्रक थेट रेल्वे वॅगनमध्ये चढवली जातात. तर, चालक आणि क्लीनर तिकीट घेऊन ट्रकमध्येच प्रवास करतात. त्याचप्रमाणे कार वॅगनमध्ये ठेवून प्रवाशांना  आपल्या  खाजगी वाहनांसह कोकण रेल्वेने प्रवास करता येणार आहे.   सध्या  कोलाड ते मंगळुरू दरम्यान ही सेवा सुरु आहे.  ट्रक थेट रॅम्पवरून वॅगनमध्ये चढवले जातात. यासाठी ट्रकचा आकार आणि वजन यांची मर्यादा आहे. त्याच प्रमाणे खाजगी चार चाकी वाहनांसाठी देखील आकार आणि वजनाची मर्यादा निश्चित करुन तशा प्रकारचे वॅगन बनवले जाणार आहेत. कोणत्या स्थानकातून ही सुविधा सुरु होईल याबाबत कोणतेही माहिती समोर आलेली नागी. मात्र, यंद्याच्या गणेशोत्सवापर्यंत ही योजना सुरु करण्याचा कोकण रेल्वेचा प्रयत्न आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर मुबई गोवा महामार्गावरुन त्रासदायक प्रवास करण्याची गरज पडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *