नवी मुंबई विमानतळ येत्या जुलै महिन्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा मार्ग सुकर होण्यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय आखण्यात येत आहे. या वॉटर टॅक्सीमुळं दोन शहरातील अंतर 40 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील नागरिकांना नवी मुंबईत पोहोचणं सोप्प होणार आहे. याविषयीचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडे असून यासाठी आवश्यक ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे. यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अंतर 40 मिनिटांत पार करता येणार असून वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे.
पर्यटकांना वॉटर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर पर्यावरणपुरक प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.